Tuesday, February 24, 2009

माझ्यावर मराठी मातीचे ऋणः गुलजार

' मोरा गोरा रंग लई ले ' असो वा ' मुसाफिर हूं यारो '... ' इस मोड से जाते हं '
असो वा ' तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही '... ' तुझसे नाराज नहीं जिंदगी ' असो वा ' दिल ढुंढता है फिर वही , फुरसत के रातदिन '... ' छोड आये हम वो गलियां ' असो वा ' चुपडी चुपडी चाची '... ' सुनाई देती है जिसकी धडकन ' असो वा ' एकही ख्वाब कई बार देखा है मैने '... प्रत्येक गाणं आजही लोकप्रिय... ; पांढऱ्या कुर्त्याची बाही सावरत , भुऱ्या रंगाचे डोळे अधिक मिचमिचे होतात. गुलजार यांच्या डोळ्यांच्या कडाही आता बोलू लागतात. शब्दांना आठवणींची किनार मिळते आणि गुलजार नॉस्टॅल्जिक झाल्याची चाहूल देणारा खर्जातील आवाज कानावर पडतो. कधी हसरं , खेळकरपणे तो सांगून जातो , तर कधी फुलपाखराच्या पंखांवरचे वेदनेचे रंग अलवारपणे टिपतो. आपलंच आपल्याला सांगतो , म्हणूनच तो बहुधा आवडतो!

लिखाणाची प्रक्रिया उत्स्फूर्त असते... त्या मागील तुमची भूमिका सांगाल का ?

( चष्म्याशी चाळा करत) घड्याळाचा सरकता काटा न मागताही आठवणींच्या पुंजक्याचं दान देतोे. मनाच्या कोपऱ्यात या धूसर गोष्टी जमा होतात. त्या मनाला एक वेगळाच आनंद देतात. मनातले शब्द कागदावर अवतरतात , ते उत्स्फूर्तपणे. सारंच काही मीटरमध्ये बसवता येत नाही. उत्स्फूर्तपणा हा माझ्या कवितेचा गाभा! अगदी ' मोरा गोरा अंग... ' पासून आताच्या ' कजरा रे ' पर्यंत!

एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारा माहौल बदलून टाकतो. मनात येणारे विचार हे व्यक्तिसापेक्ष असतात आणि वेगळेपणा हे त्याचं अध्याहृत. हेच तर कवितेचं वेगळेपण! आज या साऱ्या गोष्टींकडे पाहताना काही गोष्टी अस्पष्टपणे जाणवत राहतात आणि म्हणूनच त्या माझ्या कवितांमध्ये डोकावतात. मग ते नात्यांचं तुटलेपण असो वा स्त्री प्रतिमा! यामागील कार्यकारणभाव मात्र नेमके सांगता येणार नाहीत. त्याची चिकित्सा करण्याचा वायफळ प्रयत्नही करणार नाही. या अंधाऱ्या बाजूमुळे एक उत्सुकता कायम आहे आणि ती माझ्या कवितेतून अवतरतेय. ते उलगडून पाहण्याची इच्छा नाही. हे सारं समोरासमोर मांडता येऊ शकेल , पण मला जाणीवपूर्वक तसं करायचं नाहीए. आजपर्यंत माझं जन्मगाव पाहिलेलं नाही , पाहायचंही नाही! जखमांच्या खुणा आहेत. शरीराच्या दुखऱ्या भागावर बोट ठेवल्यावर ते खुपलेपण अनुभवण्यात गंमत असते...हे सगळं असंच काहीसं आहे!

रिमिक्सबद्दल तुम्ही काहीसे नाराज आहात असं ऐकलं ?

( हनुवटीवरून तर्जनी फिरवत गुलजार रिमिक्सवर हल्लाबोल करतात. अर्थात सारं काही सात्त्विक संतापाच्या पातळीवरूनच.) रिमिक्स हे मूळ कलाकृतीला धक्का पोहोचवतं. उद्या उठून अजंठा-एलोराचं रिमिक्स करायचं ठरवाल , तर कसं चालेलं ? असा सवाल करताना काहीसा चिडचिडेपणा जाणवत असतो. काहीतरी क्रिएटिव्ह करा. दुसऱ्याच्या कलाकृतीला विदूप करण्यात काय पॉइण्ट ? रिमिक्सच्या विरोधात आहे , कारण ते माझ्या भूतकाळाशी खेळण्याचा प्रयत्न करतात. माझा भूतकाळ बदलण्याचा हक्क त्यांना कोणी दिला ? ( त्यांचा प्रश्ान् आपल्यालाच अस्वस्थ करतो.)

बंगाली साहित्यकृतींचा तुमच्या कलाकृतींवर खूप प्रभाव आहे...

खूप गोष्टी अल्पजीवी असतात. त्यामधील गंमत अनुभवताना चिरकाल टिकणारं काहीतरी करावं , असं नेहमीच वाटत आलंय. ज्या मुशीत तयार झालो , त्याचा गुण असावा बहुधा! रवीन्दनाथ टागोर आणि बंगाली साहित्याचा आपल्या विचारप्रक्रियेवर प्रभाव आहे. बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीच्या सहवासात राहण्याचं भाग्य लाभलं. हृषिकेश मुखजीर् , बासू चॅटजीर् यांच्या संपर्कात आलो. मग जडणघडणही तशीच होत गेली. आणि हो , लग्न केलं तेही बंगाली मुलीशीच की! (हे सांगताना गुलजार दिलखुलास हसतात.)

अन् मराठीचा ?

ज्या मातीत रुजलो , वाढलो त्या मराठी संस्कृतीचेही माझ्यावर ऋण आहेत. पु. ल. देशपांडेंसारख्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभला. विकास देसाईसोबत त्यांच्याकडे जायचो. गप्पांचा फड रंगायचा. त्यावेळी उत्तम मराठी येत नव्हतं. कोणतातरी विनोद झाल्याचं इतरांच्या चेहऱ्याकडे पाहून कळायचं. मग उगाचंच कसंनुसं उसनं हसायचो. घरी आल्यानंतर विकासला विचारून जोक समजून घ्यायचो आणि आठवून एकटाच हसत बसायचो! मराठीचं हे ऋण मान्य करूनच कुसुमाग्रजांच्या शंभरेक कविता रूपांतरित केल्या आहेत. सामान्य माणसाचं दु:ख असो वा त्याची होणारी कुचंबणा , या ज्येष्ठ कवीने प्रत्येक भावना उत्तम पद्धतीने मांडली आहे. कुसुमाग्रजांच्या या प्रोजेक्टनंतर आता नव्या दमाच्या सौमित्रच्या कविता रूपांतरित करण्याचा मानस आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिलीप पुरुषोत्तम चित्रेंसोबत ' सुफीइझम ' वर काम सुरू आहे. पुढील वर्षीच्या जानेवारी-फेबुवारीमध्ये ते रसिकांसमोर आणण्याचा विचार आहे.

बंगाली आणि मऱ्हाटमोळ्या संस्कृतीचा माझ्यावर प्रभाव असला , तरी खायला प्रचंड आवडतात , त्या साऊथ इंडियन डिशेस्. मी अस्सल भारतीय आहे की नाही

तुमच्या शब्दांना खरोखर न्याय कुणी दिला असं वाटतं ?

हेमंतकुमार , सलील चौधरी , सचिनदेव बर्मन अशा एकाहून एक सरस संगीतकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. पण पंचम माझ्या शब्दांना जन्मत: असलेला नाद ओळखून होता. आयुष्याशी जुळलेली सुरांची वीण त्याच्या जाण्याने उसवलीय , असं वाटत राहतं. त्याच्यानंतर विशालसारख्या युवा कलावंताने खूप समाधान दिलं. विशालचं काम मनापासून आवडतं. त्या मुलाच्या कामाकडे बारकाईने बघा , गेल्या काही वर्षांत त्याने स्वत:वर खूप मेहनत घेतलीय. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एकप्रकारची सच्चाई असते. मनापासून करतो आणि एखादी गोष्ट आवडली नाही तरी तितक्याच मोकळेपणाने विशाल नमूद करतो.

स्वत:च्या प्रोजेक्टसाठी ' रचना आकाराला येणं ' आणि इतरांच्या फिल्मसाठी ' गाणी लिहिणं ' यात काही ' उन्नीस-बीस ' होतं का ?

( मिश्किलसं हसून) एखाद्या चित्रपटाची संहिता माझ्या हातात पडत नाही , तोपर्यंत गाणी लिहिणार नाही , हे अलिखित आहे. स्क्रिप्ट पूर्णत: माहितीय म्हटल्यावर मी त्या प्रोजेक्टचा आपोआप घटक बनलेला असतो. अशावेळी लिहिताना सापत्नभाव डोकावणार कसा ?

' मेरा कुछ सामान ' या नव्याने एकत्रितपणे आलेल्या सीडीजबद्दल काय वाटतं ?

आपलेच शब्द नव्याने भेटतात... त्यावेळी कसा फील येईल. अगदी तस्सं वाटतं! खूप नॉस्टॅल्जिक झालो नाही हेही खरं. यानिमित्ताने बराचसा गुलज्रार गवसेलही... पण तरीही काहीसा उरेलही , असंही फीलिंग येतं... ' सारेगामा ' चा हा उपक्रम स्तुत्य आहे , पण त्या पलीकडे जाऊन उगाच वयस्कर झालोय म्हणून ही सारी जमवाजमव आहे का , असा विचारही घुटमळत राहतो मनात!

कधी-कधी तुम्ही लिहिलेली गाणीही संगीतकार अथवा दिग्दर्शक नाकारतो का ?

दिग्दर्शकाला तो हक्क आहे. त्याच्या पसंतीला उतरेपर्यंत लिहित राहणं माझं कर्तव्य! इतकं साधंसोप्पं गृहितक मी मनाशी बाळगून आहे. याबद्दलचा एक किस्सा सांगतो , ' माचिस ' च्या वेळी विशालने आवर्जून एक गाणं बदलण्यासाठी सांगितलं. तो खरंतर त्याचा पहिलावहिलाच चित्रपट. पण मी गाणं खुशीने बदलून दिलं. आजच्या युवा पिढीकडून बरंच काही शिकण्याजोगं आहे , मग त्यांची टमिर्नॉलॉजी असो वा त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन! मला हे आत्मसात करायला वेळ लागत नाही... आणि का लागावा ? मी अजूनही तरुणच आहे की!

आजच्या ' जनरेशनेक्स्ट ' बद्दल काय वाटतं ?

' जनरेशनेक्स्ट ' खूपच फास्ट आहे आणि मोकळ्या मनाचीही! ही पिढी ग्लोबल आहे. आम्ही मात्र आपल्याच कोशात... गावातील मातीशी असलेलं नातं कुरवाळत बसलोय.

गुलजारची गाणी : कल्पनेच्या भरा-यांकडून वास्तवतेच्या पाय-यापर्यंत

'मुझको कोई अपना दे जा
मुझको कोई सपना दे जा
हल्का फुल्का शबनमी
रेशम से भी रेशमी...
''सदमा' सिनेमातल्या गाण्यातल्या या ओळी. एखादं मोरपीस गालावरून फिरावं इतक्या हळुवारपणे हे शब्द आपल्या मनाला मोहरून टाकतात. गुलजारच्या अशा मुलायम शब्दांबाबत बोलण्यासाठीही आपल्याकडेच शब्द शिल्लक राहत नाहीत.

गुलजार म्हटलं की कानात अनेक गाणी रूंजी घालू लागतात. एरवी फिल्मी गाणी आपल्याला पटकन आठवत नाही. पण 'थोडीसी बेवफाई'मधलं राजेश खन्नावर चित्रित झालेलं 'हजार राहे मूड के देखी, कही पे कोई सदा न आई...' हे गाणं एकदा रेडिओवर ऐकलं आणि प्रश्न पडला... इतक्या वर्षांनंतरही इतकं ताजं का वाटतं? काही उलगडाच होईना. मग कधीतरी या गाण्याचे गीतकार गुलजार असल्याचं ऐकलं आणि या ताजेपणाचं रहस्य लक्षात आलं. गाणं कधीही जुनं वाटणार नाही, असे हुकमी शब्द वापरण्याचं सामर्थ्य गुलजारकडे आहे. आजच्या संदर्भात बोलायचं झालं तर 'आंखे भी कमाल करती है पर्सनल से सवाल करती है...'असं गुलजार सहज लिहून जातो. त्यातला 'पर्सनल से सवाल' आपल्याला खटकतही नाही. आपल्या रोजच्या बोलण्याच्या भाषेत अशा अनेक शब्दांचा वापर सहज करत असतो. त्यामुळेच अशी रचना शब्दही आपल्याला परकी न वाटता आपलीच वाटू लागते.

हिंदी सिनेमातल्या गीतकारांच्या गर्दीत गुलजार नेहमीच वेगळा वाटतो. त्याच्या गाण्यातले शब्द, प्रतिमा, उपमा कधीही परग्रहावरच्या वाटल्या नाही. प्रत्यक्षात त्याच्या गाण्यातल्या अनेक प्रतिमा या खरं तर आपल्या कल्पनेपलीकडच्या...आवाक्यापलीकडच्या. पण त्या इतक्या सहजतेने वापरलेल्या असतात की आपण नकळत हळवं होऊन जातो. 'एकसो सोला चांद की राते...' असं म्हणत गुलजार उपमांच्या आकाशात नेतो आणि मग अचानकपणे त्याच्या पुढच्या 'और तुम्हारे कांधे का तील' या शब्दांतून तो आपल्याला उपमांच्या आकाशातून अलगद जमिनीवर आणून सोडतो. वास्तव आणि कल्पनेच्या जगात गुलजार अतिशय सहजतेने वावरतो. पण आपण मात्र कधी त्याच्या वास्तवात जमिनीवर वावरतो, तर कधी त्याच्या रोमँटिझम'च्या आकाशात फिरू लागतो... अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला गुंतवून ठेवण्याची, बंदिस्त करण्याची ताकद केवळ गुलजारमध्येच आहे.

'अक्स' नावाच्या सिनेमात 'बंदा ये बिंदास है'असं अगदी आपल्या जमिनीवरच्या माणसांचं गाणं गातो, तर 'ये रात' हे गाणं ऐकलं की आपण कुठल्या जगात आहोत, हे कळायला मार्गच राहत नाही. दोन्ही गीतं एकाच माणसाने लिहिली आहे. विश्वास ठेवायला थोडं अवघड जातं. गुलजारच्या तरल कवितांच्या प्रेमात पडणारी माणसं खूप सापडतील. पण तोच गुलजार जेव्हा 'कजरा रे कजरा रे' लिहून जातो, तेव्हा अरे हे काय लिहून बसलाय गुलजार, असा प्रश्न पडतो. पण गुलजारच्या कवितांमधले एकेक शब्द म्हणजे एक वेगळी कविताच. अशा वेळी गुलजारने 'गोली मार भेजे मे' लिहिणं भयाणच वाटतं. सिनेमासाठी गाणी लिहणारा म्हटलं की तो शायर राहत नाही. हव्या त्या चालीवर शब्द बांधून देणारा गीतकार ठरतो. जेव्हा सिनेमाला चांगली पटकथा, मेलोडिअस संगीत असायचं, अशा वेळी गुलजारच्या शब्दाला वेगळीच चमक यायची. 'आंधी'मधलं 'इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते...' किंवा 'मौसम'मधलं 'दिल ढुंढता है फिर वोही, फुरसत के रात दिन...' ऐकताना हे फिल्मी गीत आहे, असं म्हणण्याचा कोणी मूर्खपणा करणार नाही.

पण गुलजार मात्र सिनेमात स्थिरावताना तरुणाईची भाषा बोलायला लागला. तरल, काव्यात्मक शब्दांच्या जंजाळात अडकण्यापेक्षा साध्या शब्दातून बोलायला लागला. त्यामुळेच आजही गुलजारच्या गाण्याला आपण जुन्या जमान्यातला कवी, गीतकार म्हणू शकत नाही. गुलजारच्या कवितेची ओढ वाटायचं आणखी एक कारण म्हणजे हा माणूस समाजापासून इतका तुटलेला, वेगळा आहे, असं काही वेळा वाटतं. पण मग याला आपल्या आजूबाजूला काय घडतंय, हे इतक्या बारीकसारीक बारकाव्यानिशी कसं काय कळतं, असा प्रश्नही आपल्याला छळत राहतो. याच प्रश्नाचा शोध घेण्यासाठी आपण गुलजारच्या कवितेत हरवून जातो.

सिनेमात रूळलेली माणसं सिनेमाशिवाय कशाचा विचार करत नाही. त्यांच्या माणूस म्हणून सिनेमाखेरीज कोणत्याच संवदेना शिल्लक राहत नाहीत. पण गुलजार कवी म्हणून संवेदनशील आहे, तसाच तो पटकथा लेखक, संवादलेखक म्हणूनही आहे. 'साथिया' सिनेमातल्या एका गाण्यात, 'दोस्तो से झुठीमुठी दुसरो का नाम लेके तेरी मेरी बाते करना' किंवा 'सत्या' सिनेमात 'सारा दिन रस्ते पे खाली रिक्षेसा पिछेपिछे चलता है' इतकं वास्तववादी लिहतो. पण याच सिनेमातल्या 'बादलों से काट काट के कागजो पे नाम जोडना' असं लिहून गुलजार एकदम स्वप्नाळू उपमा देऊन जातो. किंवा अनेकदा आपण कधी त्यांनी वापरलेल्या उपमांनी थक्क होतो. तरी 'गीला पानी', 'कांच के खाब', 'कोहनी के बल पे चलता चांद' अशा उपमा सहजपणे त्याच्या फिल्मी गाण्यात येऊन जातात.

'माचिस'पासून हा गीतकार तरुणाईच्या भाषेत बोलू लागला. 'कजरा रे'ने तर विशीतल्या तरुणाची भाषेत तो बोलला. 'माचिस'मध्ये पंजाबमधल्या तरुणाईची भाषा, संवेदना तो इतक्या अचूकतेने कसं ओळखू शकतो, याचं आश्चर्य वाटतं. गुलजारने मुलीच्या, बोस्कीच्या जन्मानंतर मुलांसाठी गाणी लिहिली. त्यातही मुलांच्या छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार केला होता. बहुदा स्वत:च्या मुलीबरोबर तोही तरुण होत गेला. त्याच्या कवितांमध्ये नव्या प्रतिमा, उपमा आल्या. त्याच्या कवितेतल्या गद्यापेक्षाही त्यातली गेयता वाढत गेली. 'छई छप्पा छई, छप्पा के छई' गाण्यातला ऱ्हिदम त्याच्या तरल शब्दांपेक्षाही जास्त गुणगुणायला लावतो. त्यामुळेच हळूहळू गुलजार तरुणांच्या मनात सामावला.

'दिलसे रे' गाणं ए. आर. रहमान आणि शाहरूख खानचं. या दोघांच्या तरुणाईत गुलजारचे शब्दही तितक्याच ताकदीने तरुण झाले होते. 'चल, छय्या छय्या' म्हणताना आपण नकळत कधी ताल धरतो ते कळत नाही. पण 'ऐ अजनबी, तू भी कभी आवाज दे कहीं से...' म्हणताना त्यातला शायर अजूनही कायम आहे, हे सांगून जातो. 'घर' या सिनेमासाठी गुलजारने एकाहून एक सरस गाणी लिहिली. 'कांच के खाब है, आंखो में चुभ जायेंगे', असं लिहणारा गुलजार 'बोतल से एक रात चली है, खाब उडाके रात चली है', असंही म्हणतो. त्यामुळेच तो अजब रसायन असल्याची खात्री पटून जाते.

गुलजारच्या प्रेमात पडण्यासाठी आणखी एक कारण असतं ते म्हणजे तो आजच्या जगात सहजपणे वावरतो. रेखाच्या 'खुबसूरत'चे डायलॉग गुलजारने लिहिले. ते डायलॉग त्या काळाला साजेसे, हृषिदांच्या सिनेमाला शोभणारे होते. पिढी बदलली, समाजाची भाषा बदलली आणि ते लक्षात घेऊनच नव्या 'खुबसूरत' सिनेमात गुलजार 'ऐ शिवानी' असं गाणं लिहितातो. याच सिनेमात 'बडी खुबसूरत हो', असं म्हणताना, बडी ताजा खबर है,के तुम खूबसूरत हो, ये बिखरी लटे है इन्हे चेहरे पे गिरने दो असं रोमँटिक गाणं म्हणतो. तसं 'गश खाके हो गया निहाल कुडीए' असं डिस्कोथेक गाजवणारं गाणंही तो लिहून जातो. आजच्या कॉलेजगोअरची भाषा बोलतो. त्याचवेळी 'रॉकफोर्ड' सिनेमात 'आसमां के बाद शायद और कोई आसमां होगा... असं म्हणून पुन्हा एकदा शायर होतो. 'साथिया'च्या निमित्ताने गुलजार पुन्हा एकदा तरुण झाला. 'बंटी और बबली'मध्ये 'चुपके से ...' आणि दुसरीकडे 'धडक धडक' अशी गाणी ऐकली की गुलजार तरुणांच्या दिल की धडकन का बनला ते जाणवतं.

तो नुसताच कवी म्हणून तरुण झालेला नाही तर संवादलेखक म्हणूनही त्याच्या लिखाणात ताजेपणा दिसतोय.'साथिया'त विवेक ओबेरॉय राणी मुखर्जीला प्रपोज करताना 'आय लव यू' म्हणतो तेव्हाचा डायलॉग आठवा.
ती : फिर क्या?
तो पुन्हा : आय लव यू
मेरे लिए क्या कर सकते हो?
कुछ भी इस ट्रेन से कूद जाओगे?
हां, ट्रेन रूकतेही...
प्रेमात पडलेल्या तरुणाला इतक्या अचूकपणे ओळखणारा गुलजार आपल्याला चकीत करतो. 'बंटी और बबली'मध्ये उत्तर भारतातल्या अवधी भाषेचा लहेजा दाखवणारा गुलजार 'ओंकारा'मध्ये यूपीतली संस्कृती शब्दाशब्दातून आपल्यासमोर आणतो. 'बीडी जलई ले जिगरसे पिया जिगरमा बडी आग है' ही ओळ पटकन भुरळ घालते. अगदी 'रात भर छाना छाना रे नमक इश्क का' म्हणताना हा शब्दांचा अतिरेक आहे, असं वाटत नाही.
किंबहुना प्रेमाच्या वा इश्काच्या गोडव्याप्रमाणेच त्यातला नमकीनपणही पुढे येतो.

गुलजार काळाप्रमाणे, नव्या पिढीप्रमाणे बदललाय. पण त्याच्या जुन्या कवितांमधला, गाण्यांमधला फ्रेशनेस मात्र अजिबात कमी झालेला नाही. म्हणूनच तर तो आजच्या पिढीला जितका आपला वाटतो, तितकाच आधीच्या पिढ्यांनाही. मग ती पिढी ग्रामीण भागातली असो वा शहरी..!

अतूट नात्याची 'मर्मबंधातली ठेव'

पुण्यातल्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांचा 'विशाखा' हा काव्यसंग्रह वाचून वेडी झालेली आमची पिढी. कविता समजण्याची नुकतिच अक्कल आलेले वय. 'विशाखा'च्या निमित्ताने आपण काही विलक्षण वाचतो आहे. असा माणूस मराठी लिहितो याचेच तेव्हा भाग्य वाटे!

तेव्हा पीडीए (प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन) स्थापनेनंतर आम्ही एक-दोन नाटकेही केली होती. वृत्तपत्रात काम करत असताना एकदा शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब पुण्यात आले होते. ते कुठे उतरले आहेत हे कळल्यावर आम्ही त्यांना काहीसे भीतभीतच भेटायला गेलो. योगायोगाने तेव्हा आम्ही त्यांचेच 'दूरचे दिवे' हे नाटक राज्य नाट्य स्पधेर्साठी बसवत होतो. या नाटकाच्या निमित्ताने त्यांची ओळख व्हावी अशी आमची माफक अपेक्षा होती. फारतर ते आम्हाला हाकलून देतील असे वाटले, पण इतका हा मोठा कवी-लेखक असताना कोणतेही आढेवेढे न घेता नाटकाच्या तालमी बघायला यायला तयार झाला! १९५१-५२ सालच्या त्या मंतरलेल्या काळात असून तेव्हा शाहीर अमर शेख कुसुमाग्रजांचा 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' सादर करत होते.

' प्रत्यक्ष नाटक पाहाण्यापेक्षा नाटकाच्या तालमी मला पाहायला आवडतात', असे मिस्कील बोलत ते आमच्या तालमींना येऊ लागले. म्हाताऱ्यांपेक्षा तरुणांबरोबर बोलायला त्यांना आवडतं हे मला सहवासाअंती कळलं. त्या काळात ते गप्पा मारताना भरपूर सिगारेटी ओढत असल्यामुळे आमच्यातील काही सिगारेट पिणाऱ्यांचीही भीड चेपली आणि त्यांच्या आणि आमच्या वयातले ते अंतरही नाहीसे झाले. याचे क्रेडिट अर्थातच पूर्ण तात्यासाहेबांनाच द्यावे लागेल.

तालमी बघितल्यावर आमच्या गप्पा रात्रीच्या चांदण्यात फिरणं हे सर्वच त्यावेळच्या 'मंतरलेल्या दिवसां'चा एक अविभाज्य भाग बनलं. आमच्या नाटकाच्या तालमींना ते कधीच टीका करत नसंत. विचारलं तर हसून उत्तर देत की, 'चांगलं चाललं आहे की!' त्याच काळात आमच्या कॉलेजच्या मुलींनी बसवलेले 'उद्याचा संसार' हे नाटक मात्र अगदीच गचाळ असल्यामुळे त्यांनी त्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं.

दिवसभरातील कामं संपवून 'दूरचे दिवे'च्या तालमींना येणारे शिरवाडकर ही नंतर नित्याचीच बाब बनली. स्पधेर्त ते नाटक साफ पडले असतानाही त्यांनी त्याबद्दल खंत अथवा टीकाही केली नाही इतके ते अलिप्त आणि 'सुखदु:खे समे कृत्त्वा' या गीतेतल्या श्लोकाप्रमाणे आमच्याकडे ते प्रेमाने आणि तेवढ्याच तटस्थपणे पाहात होते.

तात्यासाहेबांची खरी ओळख आणि मैत्री वाढली ती वसंतराव कानेटकरांमुळेच. दोघेही नाशिकचे. वसंतरावांचे पहिले नाटक 'वेड्याचे घर उन्हात'मध्ये मीही काम केले होते. वसंतरावांकडे गेल्यावर ओघानेच शिरवाडकरांकडे जाणे व्हायचेच. तेव्हाही हातातले काम बाजूला ठेऊन ते आमच्याशी मनमुराद गप्पा मारत. पण त्यांची ही वृत्ती घरी येणाऱ्या प्रत्येकासाठी तशीच होती हे आम्हाला नंतर प्रत्ययाला आले.

पुढे अफ्रिकेतून भारतात परत आल्यावर नाटकात करिअर करण्याचे ठरवत असताना पुन्हा शिरवाडकरांचा संबंध आला तो 'नटसम्राट'चे स्क्रीप्ट वाचताना. दी हिंदू गोवा असोसिएशनचे रामकृष्ण नायक यांनी ते मला वाचायला दिले. झपाटल्यासारखा पहिला अंक मी घरी जाऊन आर्ध्या तासात वाचून पूर्ण केला आणि त्यातल्या सुरुवातीच्या मोनोलॉगमुळेच मी इतका इंप्रेस झालो की लगेच (सत्यदेव) दुबेला फोन करून एक अफलातून नाटक वाचत असल्याचे सांगितले. तेव्हा थिएटर युनिटमध्ये मी त्याच्याबराबर काम करत असल्यामुळे तिथे तू सर्वांसमोर वाच असे तो मला म्हणालाही. मी जेव्हा संपूर्ण 'नटसम्राट'वाचले तेव्हा वेडाच झालो!

तो माझ्या प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांचा कालखंड होता. एकीकडे मी 'आधे अधुरे' करत होतो तर दुसरीकडे 'काचेचा चंद' आणि 'इथे ओशाळला मृत्यू' ही व्यावसायिक नाटकातून कामेही करत होतो.

' नटसम्राट'चे दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा या नाटकाबद्दल बराच गोंधळ असावा. नाटकातील तिसऱ्या अंकातील अप्पासाहेब बेलवलकराच्या तोंडचा 'कुणी घर देता का घर' हा मोनोलॉग प्रत्यक्षात काढून टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतल्यावर मात्र मी थेट तात्यासाहेबांच्या कानावर घातले आणि त्यांच्या आग्रहाखातर तो सीन नाटकात कायम ठेवण्यात यश मिळवले. दारव्हेकरांनी ते अगदी नाईलाजाने मान्य केले! तेव्हाही मुंबईत असले की तात्यासाहेब 'नटसम्राट'च्या तालमींनाही येत आणि नंतर आमच्या गप्पाही रंगत.

कवी म्हणून कुसुमाग्रजांच्या ५० टक्के कविता या अफलातून आहेत, तर ५० टक्के मात्र सामान्य, अर्थात त्याखाली मात्र त्या कधीच गेल्या नाहीत. 'विशाखा' वाचून वेडे झालेल्या कॉलेजच्या वयात मी एक वर्ष गॅदरिंग सेक्रेटरी होतो. ज्या मुलीवर मी प्रेम करत असे तिला एका इव्हेंटमध्ये पहिले बक्षिस मिळाले. सेक्रेटरी असल्यामुळे बक्षिस कोणते द्यायचे हे ठरवण्याचा मला अधिकार असल्यामुळे तिला 'विशाखा' संग्रह दिला. रोमँटिक कवितांच्या या संग्रहामुळे माझ्या प्रेमभावना तिच्यापर्यंत पोचतील असा माझा होरा मात्र चुकला!

तात्यासाहेबांची मैत्री मात्र ते असे पर्यंत टिकली. त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशीच मी त्यांना भेटलो होतो. त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यावर मला तिथे थांबावेसे वाटले नाही, कारण मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहायची असल्यामुळे सर्वच ताटकळले होते. वास्तविक आमच्या या नात्यात उपऱ्या मुख्यमंत्र्यांचे काहीच देणंघेणं नव्हतं!

शिरवाडकरांच्या या अतूट नात्याची 'मर्मबंधातली ठेव' मी आजही जपून ठेवली आहे. किंबहूना त्यांची 'विशाखा' ही माझी आजही एक आवडती कविता आहे!
- डॉ. श्रीराम लागू

रहमानने ऑस्कर अर्पण केले परमेश्वराला अन् मातेला!


२२ फेब्रुवारीची हॉलीवूडमधील ती रात्र संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासाठी अविस्मरणीय अशीच होती. ‘जय हो’ या गीतासाठी त्यांना ऑस्कर जाहीर झाले, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही, पण एवढे यश मिळूनही त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही अभिनिवेश नव्हता.
पुरस्कार स्वीकारताना रेहमान यांचे शब्द होते, एल्ला पुघलम इरायवनुके (मला मिळालेला हा सन्मान परमेश्वराचाच आहे.) परमेश्वराशिवाय त्यांनी हा सन्मान त्यांच्या प्रेमळ मातेला अर्पण केला. त्यांच्या मातोश्री करिमा बेगम या पुरस्कार सोहळय़ाला कोडॅक थिएटरमध्ये आवर्जून उपस्थित होत्या. रेहमान म्हणाले, की माझ्या आयुष्यात मला नेहमीच प्रेम आणि मत्सर असे दोन पर्याय होते. त्यात मी नेहमी प्रेमाचीच निवड केली म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. ए. आर. रेहमान यांचे व्यक्तिगत आयुष्यही अनेक चढउतारांनी भरलेले आहे. वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. त्यामुळे त्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्या मातोश्री करिमा बेगम यांनी एका तामिळी साप्ताहिकाला सांगितले, की मुलाला शिक्षण देता आले नाही, याची खंत मला आयुष्यभर वाटत राहील, तसेच मुलाचे बालपण हिरावले गेल्याचे दु:खही कायम राहील.

अंधारातील इंद्रधनुष्य


‘ऑस्कर’ सोहळा म्हणजे केवळ हॉलीवूडचा दिमाखदार झगमगाट नाही. जागतिक चित्रपटसृष्टीचा तो झळाळणारा मापदंड आहे. ‘अ‍ॅकॅडमी अ‍ॅवार्डस्’ या नावाने गेली ८१ वर्षे ओळखला जाणारा हा मापदंड बऱ्याच अंशी सार्वभौम आहे. कोणतीही बलाढय़ फिल्म कंपनी, कोणताही धनाढय़ कॉर्पोरेट ग्रुप, कोणताही गाजावाजा झालेला ख्यातनाम स्टुडिओ किंवा कोणताही राजकीय पुढारी वा खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष या पुरस्कारांवर आपला ‘प्रभाव’ टाकू शकत नाही. म्हणूनच, राजकारणापासून कटाक्षाने दूर राहिलेल्या या सोहळ्यातही काही वेळा स्पष्ट शब्दांत अमेरिकेच्या युद्धखोर धोरणाचा निषेध काही दिग्दर्शक- कलावंतांनी करण्याचे धैर्य दाखविले आहे. विशेष म्हणजे त्या सोहळ्याला हजर असलेल्या स्टार्स-सुपरस्टार्सनी तशा निषेधाचे टाळ्या वाजवून स्वागतही केले आहे. अमेरिकन महासत्तेच्या महाप्रांगणात अशी स्वायत्तता दाखवायची हिंमत मायकेल मूर, मार्लन ब्रॅण्डो, डस्टिन हॉफमन, जेन फोंडा, अ‍ॅन्थनी क्विन अशा अनेकांनी दाखविली असल्यामुळेही ‘ऑस्कर’च्या या मापदंडाला ती प्रतिष्ठा व तेज प्राप्त झाले आहे. अर्थातच ‘ऑस्कर’ सन्मानाची खरी प्रतिष्ठा त्यातून व्यक्त होणाऱ्या कलाकृतीच्या गुणवत्तेची असते. म्हणूनच भले भले दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, लोकप्रिय अभिनेते वा अभिनेत्री आणि इतर कलाकार ‘ऑस्कर’ सन्मानासाठी अक्षरश: जिवावर उदार होऊन त्याची प्रतीक्षा करीत असतात. कित्येक जणांची नावे पहिल्या टप्प्यात नामांकनाच्या यादीत झळकतात आणि प्रत्यक्ष पुरस्काराच्या दिवशी कुठेही दिसत नाहीत. अनेक वर्षे वाट पाहून, कित्येक वेळा आशा सोडून निराशेच्या गर्तेत सापडलेल्या काही जान्या-मान्या कलावंतांना कधी तो आकस्मिकपणे सन्मान मिळतो आणि त्यांना जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. पैसे, लोकप्रियता, प्रसिद्धी यापेक्षाही ‘ऑस्कर’ सन्मान प्रतिष्ठेचा वाटणे हा त्या ‘अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डस’चाच गौरव आहे, असे म्हणावयास हवे. या यादीत फ्रँक सिनात्रा, डेव्हिड लीनपासून ते अगदी केट विन्स्लेट (जिला रविवारी ‘द रीडर’साठी पुरस्कार मिळाला.) पर्यंत अनेक नामवंत सापडले होते. मेरिल स्ट्रीपसारख्या गुणी अभिनेत्रीला १५ वेळा नामांकन मिळूनही ती अजून प्रतीक्षेतच आहे. काहींना त्यांच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात जीवनगौरव ऊर्फ ‘लाइफ टाइम अ‍ॅचीव्हमेण्ट अ‍ॅवॉर्ड’ मिळाले, पण त्यांच्या कलाकृतीचा सन्मान झाला नाही. मुद्दा हा की, ‘ऑस्कर’ सन्मान ही वशिल्याने, पैशाने, दबावतंत्राने मिळत नाही. याचा अर्थ त्याबद्दल वाद होत नाहीत, असा नाही. कलाकृतींचा दर्जा वा गुणवत्तेबद्दल वाद होणे स्वाभाविक आहे; परंतु मतभेद व्यक्त करणारे रसिक व समीक्षकसुद्धा ‘ऑस्कर’ची दखल तितक्याच आदराने घेतात. ‘स्लमडॉग मिलिऑनर’ला नामांकने मिळू लागल्यावर मात्र स्वयंभू सिनेपंडित, डावे ‘सर्वज्ञ’ विचारवंत, हिंदुत्व आणि हिंदू संस्कृती जपण्याचा मक्ता घेतलेले कार्यकर्ते आणि ‘शायनिंग इंडिया’ची कॉर्पोरेट जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर असल्यासारखे दाखविणारे भाष्यकार या सर्वानी या चित्रपटावर टीकेची झोडच उठवायला सुरुवात केली होती. त्यामुळे भारतात चित्रपट प्रकाशित व्हायच्या अगोदरच त्यावरची टीका प्रसिद्ध होऊ लागली होती. यात आघाडी जरी अमिताभ बच्चन यांनी घेतली असली तरी एकूण ‘इंटेलेक्च्युअल’ आणि लांब चेहऱ्याचे व विश्वाची चिंता वाहणारे काही ‘क्रिटिक’ ऊर्फ चिकित्सक-समीक्षक मात्र भारताच्या ‘दारिद्रय़ाच्या व्यापारीकरणा’मुळे व्यथित झाले होते. साहजिकच ‘स्लमडॉग’वरच्या चर्चेला काहीसे राजकीय रंग येऊ लागले होते. भारत एक जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या पथावर असताना धारावीच्या विदारक स्थितीचे चित्रण करून, देशाला नाउमेद करण्याचा हा ‘डाव’ आहे, या उजव्यांच्या टीकेपासून ते कॉर्पोरेट शैलीत गरिबांची थट्टा करण्याचा हा एक कमर्शिअल कट आहे, या डाव्यांच्या टीकेपर्यंत ही समीक्षा गेली होती. ज्यांना या राजकीय चर्चेत जायचे नव्हते, पण तरीही ‘स्लमडॉग’ची भेदकता निर्थक ठरवायची होती त्यांनी ‘स्लमडॉग’ हे नावच झोपडपट्टीत राहणाऱ्यांना अपमानकारक आहे, असे म्हणावयास सुरुवात केली तर इतर काहींनी ‘काय नवीन आहे या चित्रपटात? सगळा बॉलीवूड मसालाच तर आहे’ असे म्हणून त्या चित्रपटाचे अवमूल्यन सुरू केले. काहींनी ‘रहमानच्या या संगीतात त्याची खरी भरारी आलेली नाही,’ असे म्हणायला तर इतर समीक्षकांनी ‘मूळ कादंबरी कितीतरी अधिक चांगली आहे व त्यापेक्षा चित्रपट अगदीच मामुली आहे,’ असे पांडित्य प्रकटायला सुरुवात केली. आता या सर्वच पंडितांची गोची झाली आहे. ‘ऑस्कर’ पुरस्कार देणाऱ्या ज्युरींना चित्रपट हे माध्यमच कळत नाही, अशी टीका त्यांना करता येणार नाही. कारण ‘अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डस्’ देणाऱ्या आतापर्यंतच्या ज्युरींनी ‘गॉन विथ द विंड’ आणि ‘माय फेअर लेडी’ या चित्रपटांना, तसेच ‘गांधी’ आणि ‘शिंडलर्स लिस्ट’सारख्या चरित्रात्मक चित्रपटांना, ‘बेनहर’ आणि ‘टायटॅनिक’सारख्या महानिर्मितींना प्रत्येकी आठ वा त्याहूनही अधिक ऑस्कर सन्मान जाहीर केले होते. त्या चित्रपटांना दिलेले सन्मान बरोबर होते तर ‘स्लमडॉग’बद्दलचे त्यांचे सिनेज्ञान अपुरे पडले हे म्हणणे त्यांना कठीण आहे. शिवाय तमाम ज्युरींना एकमुखाने भारताची बदनामी करायची होती, हेही सिद्ध करणे त्यांना अशक्य आहे. त्याचप्रमाणे ‘स्लमडॉग’च्या निर्मात्यांनी ‘लॉबिंग’ करून सन्मान पळवले, असेही त्यांना म्हणता येणार नाही. कारण भारतातील विद्वान समीक्षकांनी लगेचच टीकेचा भडिमार सुरू केला होता. परंतु तरीही खळखळ उरतेच. पूर्वीच्या ‘बूट पॉलिश’ किंवा ‘आवारा’, ‘शहर और सपना’ व ‘फिर सुबह होगी’ अशा चित्रपटांमध्ये गरिबी, उपेक्षा, अन्याय हे सर्व आलेच होते. शिवाय ‘दीवार’ वा ‘कुली’सारख्या चित्रपटांमध्ये दारिद्रय़ाच्या दलदलीतून ऐश्वर्याच्या हवेलीपर्यंतचे, ‘रॅग्ज् टू रिचेस्’ प्रवासाचे चित्रणही केले गेले होते. मग ‘स्लमडॉग’ने काय नवीन सादर केले, असा प्रश्न विचारला जातो आहे. परंतु ‘स्लमडॉग’ची त्या चित्रपटांशी वा ‘सलाम बॉम्बे’शी किंवा ‘धारावी’ डॉक्युमेन्टरीशी तुलना करण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही. ‘स्लमडॉग’च्या दिग्दर्शकाने आपला चित्रपट सामाजिक बांधिलकीच्या ऊर्मीतून निर्माण झाला, असे कधीही म्हटलेले नाही. तसेच तो ‘समांतर’, ‘न्यू वेव्ह’ वा ‘आर्ट फिल्म’च्या परंपरेतला आहे असाही दावा त्यांनी केलेला नाही. आपण कादंबरीबरहुकूम चित्रपट काढला आहे, असेही म्हटलेले नाही. दिग्दर्शक आणि पटकथालेखक ब्रिटिश, बहुतेक तंत्रज्ञ भारतीय, अनेक कलाकार भारतीय, संगीत रहमानचे, ध्वनिसंकलन करणारा भारतीय, चित्रपट इंग्रजीतला (हिंदीत डब केलेला) हॉलिवूडच्या धर्तीवरचा हा ‘स्लमडॉग’ एकदम आठ सन्मान कशामुळे प्राप्त करू शकला? अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डस् देणाऱ्या ज्युरीज्ना बॉलिवूडचा परिचय नाही असे नाही. ‘गांधी’ सारख्या चित्रपटाला आठ अ‍ॅवॉर्डस् आणि ‘स्लमडॉग’लाही आठ अ‍ॅवॉर्डस् देणाऱ्या ऑस्करच्या ज्युरीज्ना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नाही, असेही म्हणणे शक्य नाही. म्हणजेच ‘स्लमडॉग’मध्ये त्यांना असे काही भावले असावे किंवा त्यांना या चित्रपटाने असे हलवून सोडले असावे की त्यांना एकमताने त्याचीच निवड करणे न्याय्य वाटले. ‘स्लमडॉग’ हा खरे म्हणजे केवळ चित्रपट म्हणून पाहताच कामा नये. तो एक माणसाला मुळापासून हादरवून टाकणारा अनुभव आहे. तो अनुभव फक्त दारिद्रय़ाचा, घाणीचा, दरुगधीचा, भयाणतेचा, दंगलींचा, हलाखीचा, पिळवणुकीचा, माफियाचा, वेश्यावस्तीचा, गुन्हेगारीचा नाही. तर त्या विदारक स्थितीत परिस्थितीशी चार हात करताना ‘फॅन्टसी’द्वारे जीवनातून आनंद आणि आशा निर्माण करण्याचा जीवघेणा संघर्ष आहे. त्या उद्ध्वस्त जीवनाच्या दलदलीतही प्रेमाचे कमळ फुलते आणि बालपण विस्कटलेली मुलेही जगाकडे कुतूहलाने पहात शिकू शकतात आणि ‘शायनिंग इंडिया’च्या झगमगाटाने दिपून न जाता स्वत:च तेजस्वी प्रकाशमान तारे कसे बनू शकतात, याचे ते चित्तथरारक चित्रण आहे. ‘न्यूयॉर्कर’ या न्यूयॉर्कहून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकाच्या ‘लेटर फ्रॉम मुंबई’ या थेट धारावी परिसरातून पाठविलेल्या वार्तापत्रात लेखिका कॅथरिन बूने हा संघर्ष, ‘स्लमडॉग’च्या निमित्ताने टिपला आहे, तसा भारतातील कोणत्याही पत्रकाराने वा समीक्षकाने साधा प्रयत्नही केलेला नाही. ‘स्लमडॉग’ आपल्याला विषण्ण करतो. कारण आपण आपल्याच रोज दिसणाऱ्या भीषण वास्तवाकडे किती असंवेदनक्षमतेने पाहतो आणि किती क्रूरपणे त्याकडे दुर्लक्ष करतो याची तीव्र जाणीव करून देतो. आपणच या चित्रपटातील खलनायक बनतो आणि धारावीतील प्रत्येक निष्पाप मुलगा/मुलगी तेजस्वी नायक होतात. आपल्या अंतर्मनात शिरून स्वत:च्याच मनातील क्रौर्य आणि घाण विदारकपणे दाखवितानाच या ‘लव्ह स्टोरी’तील रोमान्स आपल्या अंधारलेल्या मनातही इंद्रधनुष्य निर्माण करतो.

Saturday, February 14, 2009

‘थर्ड आय’

पायात जाडजूड, घट्ट लेसचे शूज, अंगावर अ‍ॅसिड वॉश्ड जीन्स, कमरेवर भला मोठ्ठा बेल्ट, कमरेवरच्या उघडय़ा शरीरावर असंख्य मुलींची नावं लिहिलेली, डोक्यावर अगदी बारीक खुरटे केस आणि त्यातून कवटी चिरत जाते आहे असं वाटावं अशी एक वेडीवाकडी जाड रेष! अशा अवतारात तो आपल्या पिळदार दंडांचं आणि भरदार छातीचं प्रदर्शन करत कॉलेजच्या आवारात येतो. अचानक त्याच्याभोवती झुंबडगर्दी गोळा होते. गर्दी त्याच्या नावाचा जयघोष करत, टाळ्या वाजवत त्याच्याबरोबर चालत राहते. हा तांडा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये घुसतो. तिथे बसलेल्या असंख्य मुलींचा घोळकासुद्धा मग त्याच्या नावाचा जयघोष करायला लागतो आणि अचानक..
आणि अचानक तो एका मुलीजवळ थांबतो, एक पाय दुमडून गुडघ्यावर बसतो आणि कुठूनतरी जादू करावी तसं टप्पोरं गुलाबाचं फूल काढून तिला देतो आणि म्हणतो, ‘आय लव्ह यू!’ मग तीही क्यूट लाजते आणि म्हणते, ‘आय अ‍ॅम फ्लॅटर्ड!’ तो उठून उभा राहतो आणि आनंदाने किंचाळतो, ‘प्यार किया तो डरना क्या?’
हा कुठल्याही सिनेमाचा पार्ट टूचा सीन नाही. बिहारमधल्या कुठल्याशा एका गावात, व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने, एका प्रेमवीराची चाललेली ती खरी रिहर्सल होती. प्रेमभावना व्यक्त करायची ही अनोखी अदा असेल कदाचित! पण त्या मुलीला आवडली असेल ही अदा? असेलही कदाचित! कारण प्रेम आंधळं असतं म्हणतात ना? मग कोणी तरी कोणाच्या तरी फक्त
डोळ्यांवरच प्रेम करतं, तर कोणी हसताना पडणाऱ्या खळीवर, तर कोणी कोणाची हंसकी चाल बघून प्रेमात पडतं. कोणी त्यांच्या कवितांवर, कोणी स्वभावावर, कोणी एखाद्या कलानिपुण शैलीवर..
पण आता हेही सगळं जुनं झालं असेल नाही? आता प्रेमी युगुलं हुशार आणि व्यवहारी होत चालली आहेत. आता जोडीदाराचा बँक बॅलन्स बघितला जातो. घरात बहीण भावंडं- किती याचा सुगावा लागतोय का ते बघितलं जातं. व्यसन नसेल तर बावळटपणाचं लक्षण समजलं जातं. उघडय़ा छाताडावर अनेक मुलींची नावं लिहूनसुद्धा शेवटी मलाच गुलाबाचं फूल दिलं याचा अत्यानंद असतो.
कालानुरूप विचार बदलतात. अनेक गोष्टी बदलत असतील, तर प्रेम ही संकल्पनासुद्धा बदलत चालली असेल तर त्यात गैर काय? उलट असं म्हणणारे, विचार करणारेच मूर्ख आहेत असं म्हणायला हवं. काही काळापूर्वी प्रेमभंग झाला किंवा प्रेम विफल झालं, तर समाजात बोभाटा व्हायचा. आता सूडभावनेने मुडदे पडतात एवढंच ना? आणि त्याचे पडसाद चित्रपटात किंवा चित्रपटातल्या अशा सूडनाटय़ाचे पडसाद प्रत्यक्षात उमटतात एवढंच ना? प्रेम विफल झालं तर अ‍ॅसिडची बाटली वापरणं किंवा प्रेमात मोडता घालणाऱ्यांचे मुडदे पाडणं, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, असं एका कॉलेजच्या मुला-मुलींचं म्हणणं आहे आणि नुसतंच आश्चर्य नाही तर त्यात काही गैर आहे असंही त्यांना वाटत नाही.
यासाठी ही मुलं चक्क गजनी, बाजीगरसारख्या सिनेमांचे दाखले देतात; इतिहासातले, पुराणातले दाखले देतात. सीतेला रावणाने पळवली, तेव्हा म्हणे प्रेमापोटी लंका जाळलीच ना? किंवा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, त्यानंतर ‘महाभारत’ घडलंच ना? मग आता जे चित्र दिसतंय ते सूडभावना, बदला याचं. आणि पुराणात होतं ते काय? व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने, ‘पूर्वीची आणि आत्ताची प्रेमसंकल्पना’ याऐवजी ‘पूर्वीची आणि सध्याची सूडभावना’ या विषयावर चर्चासत्र किंवा निबंध स्पर्धा वगैरे कोणी घेत असतील तर आश्चर्य वाटू नये.
चित्रपटात नायकाचं प्रेम विफल झालं, नायिकेचा हकनाक जीव गेला, म्हणून संपूर्ण चित्रपटात सूटनाटय़ दाखवलं गेलं आणि नायक-नायिकेच्या नावाऐवजी, खलनायकाचं- ‘गजनी’चं नाव अजरामर करण्यात आलं किंवा नायकांनी सूड उगवून लढाई जिंकली (?) म्हणून प्रसिद्धी माध्यमांनी त्याला ‘बाजीगर’ ठरवलं. तसंच पुराणातल्या या सूडकथा ‘रावण’ किंवा ‘दुर्योधन’ या नावांनी प्रचलित व्हायला हव्या होत्या; रामायण आणि महाभारत नव्हे! असं म्हणणारे प्रेमवीरही आहेत.
नव्या पिढीचे हे ‘बदलते विचार’, कॅफे कॉफी डे किंवा बरिस्ताच्या अड्डय़ावर ऐकायला मिळतात. पण खरंच असं कुठे चर्चासूत्र असेल तर हे ‘बदलते विचार(?)’ मांडणारे आणि ऐकणारे, उद्या कदाचित त्यावर प्रबंध लिहून तो सरकारला सादर करतील किंवा तो आम जनतेच्या पुढे मांडतील.
बंगालच्या सरकारला कलीयुगाची खूप काळजी आहे. तरुणांसाठी ‘लव्हर्स पार्क’ बनवायचं त्यांचं स्वप्न आहे. सरकार चालवताना राजकारणात जोडो, तोडो, फोडोचा कम्युनिझम असला तरी इथे मात्र प्रेमवीरांची त्यांना केवढी काळजी आहे? भरवस्तीत, चारचौघांत, बसस्टॉपवर, ट्रेनमध्ये सिनेमागृहाच्या अंधारात प्रेमाचे उथळ चाळे करण्यापेक्षा एक निसर्गरम्य वातावरणात, ज्यांना जी उत्स्फूर्तता दाखवायची आहे ती दाखवा, असा कदाचित सरकारचा उद्देश असावा. चिमुरडय़ांनी फुलपाखरासारखं बागडावं, खेळावं म्हणून बालोद्याने निर्माण झाली. प्रमोद नवलकरांना ज्येष्ठांबद्दल काळजी वाटली, म्हणून आजी आजोबा किंवा नाना-नानी पार्क यशस्वीपणे उभी राहिली. मग प्रेम करणाऱ्यांनी काय गुन्हा केला? म्हणूनच बहुदा आता लैला-मजनू पार्क, वासू-सपना पार्क, बाजीराव-मस्तानी पार्क आणि मग हळुहळू गजनी पार्क, बाजीगर पार्क निर्माण होतील. राजेरजवाडय़ांच्या जमान्यात, मोगलांच्या कारकीर्दीतही ‘कुंजवनात’ प्रेम फुलायचेच ना? मग आताच एवढा गहजब का? या नव्या पिढीच्या प्रश्नाला उत्तर नाही.
‘आमच्या काळी असं होत’ं सांगणाऱ्यांना, ही पिढी विचारते, ‘मग आम्ही काय वेगळं करतो?’ तुमच्या काळी विवाहबाह्य संबंध होतेच. आम्ही ते फक्त उघडपणे ठेवतो. तुम्ही प्रेमगीत गात होतात; आम्ही लव्हसाँग्ज गातो. तुमच्या भावना तुम्ही कवितेतून, लेखातून, प्रेमपत्रातून व्यक्त करत होतात; आम्ही त्या उघडपणे व्यक्त करतो. देवाधिकांपासून राजेमहाराजे करत होते ती प्रीती! काळानुसार सगळं बदलत गेलं. त्यांच्याइतकी सात्विक प्रीती तुम्हाला जमली नाही म्हणून ते प्रेम? आणि आम्ही तुमच्या पुढे एक पाऊल टाकून धाडस करतो म्हणून ते लफडं किंवा अफेअर? खरं सांगायचं तर तुमचं आमचं सेम असतं ना?
पण कलीयुगातल्या प्रेमवीरांनो, आपल्या सोयीनुसार, कुठल्याही गोष्टीचे अर्थ बदलू नका. मनमानी अर्थ लावू नका. प्रेमगीत आणि लव्ह साँग्ज याची तुलना करु नका. ‘चंदनसा बदन, चंचल चीतबन, धीरेसे तेरा ये मुस्काना’ अशी हळुवार प्रेमगीतांची आणि ‘तेरी पॅन्ट भी सेक्सी, तेरा रुमाल भी सेक्सी’ अशा गीतांशी तुलना करु नका. तुमचं आमचं सेम असतं म्हणणाऱ्यांनो, पूर्वी उत्तान नाचावर रेव्ह पाटर्य़ा उघडपणे साजऱ्या होत नव्हत्या. प्रेयसी आपला शृंगार, आपल्या प्रियकरालाच उलगडून, उघडून दाखवायची; हल्ली मात्र प्रियकराला भेटायला जाताना प्रेयसीचा तो शृंगार जगाला उघडपणे दाखवतच प्रियकराकडे पोहोचायची प्रथा सुरु झाली आहे. रोमियो-ज्युलिएट मधला रोमिओ, आता स्वत:च अंगप्रदर्शन करुन रोड रोमियो व्हायला लागलाय. पूर्वीसारखी प्रेमपत्रांतून व्यक्त होणाऱ्या कवितांची जागा, आता सार्वजनिक मुताऱ्यांमधला आणि शौचालयातल्या भिंतींनी किंवा ट्रेन-बसमधल्या पत्र्यांनी पटकावल्या आहेत.
हे सर्व प्रकर्षांने जाणवतंय, पण याचा अर्थ या समाजातील प्रेमसंकल्पना, प्रेमभावनाच पूर्ण दूषित झाली आहे किंवा संपुष्टात आली आहे, असा अजिबात आरोप नाही. परंतु, त्या प्रेमसंकल्पनेला, भावनेला बदलत्या काळानुसार कुठेतरी कीड लागली आहे हे नक्की. प्रेमभावना, प्रेमसंकल्पना यांच्या व्याख्याच बदलत चालल्या आहेत, त्यामुळे त्याचा आदर बाळगणं, मान राखणं हेही आपोआप कमी होत चाललंय आणि त्यामुळे नातेसंबंधामधली दरी वाढत चालली आहे.
व्हॅलेंटाईन या कोण्या एक पाश्चात्य धर्मगुरुने प्रेम व्यक्त करण्याच्या भावनेला सर्वश्रेष्ठ मानलं. त्या प्रेमाचा आदर राखण्यासाठी प्रसंगी इतरांशी वितुष्ट घेतलं. त्यानिमित्त, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ जगभर प्रेमभावना, नव्याने जागृत होऊन त्याचा आदर राखावा अशी किमान अपेक्षा असते. कलीयुगातही अजून प्रेमभावनांचा आदर टिकवणाऱ्या इतरांनी जर सूडभावनेची ही कीड वेळीच खुडून काढली नाही, तर प्रेमापेक्षा द्वेषाच्या उदात्तीकरणाचे दिवस साजरे करण्याची वेळ आपल्यावर येईल. आणि मग आत्मा, आत्मप्रियता हरवलेल्या यंत्रमानवाचीच लोकसंख्या या विश्वावर साम्राज्य करेल..

पृथ्वीच्या जैविक पसाऱ्याचे सूत्र


१२ फेब्रुवारी २००९ ही चार्ल्स डार्विनची २०० वी जयंती. यंदा त्याच्या उत्क्रांतीवादाला १५० वर्षे होत आहे. आधुनिक विज्ञानाचा तो पाया असला तरी सिद्धांत मांडण्यात आला तेव्हा तो अमान्यच झाला. त्याचे महत्त्व पटायला विद्वान माणसाच्या अनेक पिढय़ा जाव्या लागल्या..
या वर्षी म्हणजे २००९ साली गॅलिलिओप्रणीत खगोल विचारांना ४०० वर्षे पूर्ण झाली. याच वर्षांमध्ये डार्विनची २०० वी जयंती आहे आणि ‘ऑरिजिन अव्ह स्पेसीज’ या त्याच्या


क्रांतिकारक सिद्धांताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. गॅलिलिओच्या सिद्धांताने माजलेली खळबळ आता ओसरली आहे. चर्चच्या धर्म मरतडांनी गॅलिलिओला मरणोत्तर माफीसुद्धा जाहीर केली आहे. पण तितकाच व्यापक आणि क्रांतिकारक असलेल्या डार्विनला हे भाग्य अजून लाभायचे आहे.
‘उत्क्रांती’ ही कल्पना इरास्युख डार्विन यांनी म्हणजे चार्ल्स डार्विनच्या आजोबांनी सुचविली होती. नंतर ज्यो बाप्तिस्ता जाँ हमारने तिचा पाठपुरावा केला. डार्विनचे काही समकालीनदेखील या कल्पनेच्या उभारणीत होते. परंतु त्या कल्पनेला आधारभूत असा कार्यकारणभाव व त्यातले इंगित त्यांना गवसले नव्हते. अफाट निरीक्षणे, पुरावे, माहिती याच्या जंजाळात तर्कसंगती शोधताना चार्ल्स डार्विनला ‘निसर्गाचा वेचकपणा’ किंवा ‘निवडीचे सूत्र’ गवसले. ‘ऑरिजिन अव्ह स्पेसीज’मुळे धर्ममरतड बिथरले. तो संताप अजून विरलेला नाही. तो अजूनही निर्मिकवाद (क्रिएशनिझम) विरुद्ध बुद्धीपुरस्सर योजनावाद (इंटेलिजंट डिझाइन) असा खदखदतोच आहे.
पण यापेक्षा अधिक पोषक उत्पात जीवशास्त्रात झाला. जीवशास्त्रज्ञ मोठय़ा चिकाटीने जीवाश्म, जीवांचे नमुने गोळा करीत होते. ते पारखून त्यांची वर्गवारी करीत होते. पण सर्वाच्या मुळाशी काही साधम्र्य आहे, त्यांच्यातली विविधताही काही सांगते का, हे त्यांना शोधावेच लागले. ही विविधता कशी उपजली? कशामुळे? त्याला काही सूत्र आहे का? जीव उपजले, कोणी तगले, कोणी निमाले, असे कशाने होते? परिस्थितीशी जुळवून घेणारे (अनुकूलन साधणारे) तगतात. त्यांच्याच वर्गातला वंश बघायला मिळतो. (निसर्गाची निवड) अशी काही विशिष्ट यंत्रणा असते का? अशा प्रश्नाशी भिडता भिडता जीवशास्त्रीय माहितीला, तथ्यांना, विचारांना एक चौकट आवश्यक वाटली. चार्ल्स डार्विनने त्यांचा वेध घेताना इतके पुरावे आणि निसर्गातल्या साक्षी समोर ठेवल्या की त्यामुळे ‘उत्क्रांती’ ही अटकळवजा कल्पना राहिली नाही.
दिवसागणिक पुराजीवी व सूक्ष्म जीवशास्त्राला इतके पुरावे व दाखले लाभत गेले की, त्याचे ठाशीव सिद्धांत बनले. आजघडीला असलेल्या उत्क्रांतीशास्त्राची पायाभरणी डार्विनने केली. त्यातली सगळी दालने त्याने उघडली, असे नव्हे. आज उपलब्ध असलेले अनुवंशशास्त्र, संख्याशास्त्र, जनुकशास्त्र आणि त्यांच्या प्रष्टद्धr(२२४)नांचा छडा लावण्याच्या रीती तेव्हा नव्हत्या. मेंडेलचे अनुवंश व जनुकविषयक प्रतिपादन प्रकाशित झाले तेव्हा ‘उत्क्रांती’ कल्पनेचा अवतार संपला, असे बहुतेक लोक मानू लागले होते. पण फिशर, हाल्डेन प्रभृतींच्या संशोधन व विचारातून उलटेच झाले. उत्क्रांतीशास्त्र अधिक बळकट आणि व्यापक झाले.
संशोधनाची उपकरणे आणि सीमारेषा सुधारत गेल्या, तसे या सिद्धांताचे रूप अधिक समावेशक बनू लागले. हा शास्त्रविचार एककलमी गुरुकिल्लीवाद नाही. जीवसृष्टीच्या घडामोडींचा उलगडा परस्परबद्ध पण भिन्न सूत्रांनी केला जातो. नैसर्गिक निवड, उत्परिवर्तन (म्यूटेशन), अनुवंशता, अनुकूलन, अनिश्चितता आणि संभाव्यता अशा निरनिराळ्या प्रेरणांची एकवट कालौघात कशी प्रकटते याचा शोध घेणारी ही प्रणाली आहे.
जीव रसायने, बिजाणूशास्त्र, नॅनोतंत्र यांच्या संकराने जीवशास्त्राची छबी झपाटय़ाने पालटते आहे. जीवाबद्दलचे आकलन जैवतंत्रातल्या सुधारणांमुळे अधिक धारदार बनत चालले आहे. याला चालना उत्क्रांतीशास्त्रामुळेच मिळाली.
जीवांमधील संघर्ष सहज आहे. उत्क्रांती आणि परिसर, पर्यावरण यांचा कसा कसा संबंध येतो? अशा कितीतरी विभिन्न प्रश्नांनी प्रेरित केलेल्या नव्या शाखा उदयाला आल्या आहेत. औषधविज्ञानापासून मनोविज्ञानापर्यंत उत्क्रांतीशास्त्राची छाया पसरली आहे. उत्क्रांतीशास्त्र हे सगळ्या जैविक पसाऱ्याला एका परिघात आणणारी प्रणाली आहे. परंतु या व्यापक सिद्धांताची अजूनही समाजमानसात घडी बसलेली नाही. भल्याभल्या सुशिक्षितांच्या याबाबतच्या धारणा अगदी विपरित आहेत. ‘उत्क्रांती म्हणजे माकडापासून माणूस बनला,’ ‘उत्क्रांती म्हणजे आपल्या दशावतार कथा’, ‘उत्क्रांती म्हणजे बळी तो कान पिळी’, ‘उत्क्रांती म्हणजे स्वार्थीपणे जगण्याचे तत्त्वज्ञान’ अशा अनेक बालीश अडाणी धारणांचा जबर पगडा आजही आहे. ‘निसर्गातील विविधता, चक्रावून टाकणारी यंत्रणा व सामग्री ही कुण्या अद्भूतकर्त्यांची नक्षीदार बुद्धीपुरस्सर करामत आहे’, ही श्रद्धा सहजी सुटत नाही. त्याला छेडणारे कुठले प्रतिपादन सहजी गळी उतरत नाही, त्याचा हा परिणाम असावा!
त्यातच या शास्त्राच्या वाटचालीत आणखी काही किटाळ त्याच्या वाटय़ाला आले. ‘सुप्रजनन शास्त्र’ म्हणजे हेतुपुरस्सर शेलक्या गुणधर्मीयांचा संकर घडवणे व त्यातून महाबळी, आदर्श जीव तयार करणे, ही कल्पना एकेकाळी लोकांच्या मनात अशी रुजली की ती सहजी पुसली जात नव्हती. अमेरिकेपासून कम्युनिस्ट रशियापर्यंत सर्वत्र हे वेड होते. ‘सुप्रजनन शास्त्रा’ची उत्क्रांती शाखेशी असणारी गणिती जवळीक आणि वेडगळ वंशश्रेष्ठत्व कल्पना यामुळे हे किटाळ उत्क्रांतीशास्त्रांतील कल्पनांवर उडाले. समाजशास्त्रामध्येही बळी तो कान पिळीसारखी सूत्रे लावून प्रतिपादन करणारे शास्त्रज्ञ उपजले.
वस्तुस्थिती नेमकी उलट आहे. उत्क्रांतीशास्त्र उमगले तर वंशश्रेष्ठत्व, वर्णश्रेष्ठत्व, नैसर्गिक उच्चनीचता या कल्पनांना बाधा येते; पुष्टी मिळत नाही. चार्ल्स डार्विनचे काही बुजुर्ग चरित्रकार उत्क्रांतीच्या विचारामागे डार्विनचा गुलामगिरीला असलेला कडवा विरोध ही प्रेरणा होती, असे नमूद करतात. पण हे लक्षात कोण घेतो? काही तथाकथित विचारवंत रशियातील पडझडीनंतर ‘मार्क्‍स हरला डार्विन जिंकला’ असे अजागळ नारेवजा लेख लिहित होते!
दुर्दैवाने जीवशास्त्राला व्यापारी झळाळी नाही. आणि त्याचा बौद्धिक दरारा, दबदबा नाही. एकविसाव्या शतकामध्ये जैवतंत्रज्ञानाची चलती येणार असल्याने कदाचित ही अवस्था पालटेलही. पण या शाखांच्या प्रवेश खिडकीपाशी अजून विद्यार्थ्यांची रांग दिसत नाही. प्रयोगशाळा सहायक बनविण्याची कुवत असलेल्या बायोटेक्नॉलॉजीला मात्र तुरळक गर्दी लाभू लागली आहे. परिणामी या शाखांत व या शाखांना गोवणाऱ्या उत्क्रांती शास्त्राबद्दल अनास्था असल्यास नवल नाही.
सूक्ष्मजीव आणि विचार, त्यामुळे होणारे आजार, औषधे आणि औषधांना धाब्यावर बसवणारी जीवाणू विषाणूंची प्रतिकारशक्ती हा आटय़ापाटय़ा वैध शास्त्रातील लोक नित्याने अनुभवतात. पण याचा उत्क्रांतीशी काही संबंध आहे, अशी शंकादेखील त्यांना चाटूनदेखील जात नाही. उच्चविद्याविभूषितांची ही तऱ्हा तर सामान्यांची काय कथा? या क्रांतीकारक ग्रंथाच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने ही अनास्था दूर करत प्रबोधन करण्याचा शाळा, महाविद्यालये प्रयत्न करतील, अशी आशा करू या!

Thursday, February 12, 2009

व्हॅलेन्टाइन डे

ज्यांना ज्या प्रकारची प्रेमभावना व्यक्त करायची आहे, त्या रंगाचे फूल दुसऱ्याला देण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळणे म्हणजे "व्हॅलेंटाइन डे.

स्त्री व पुरुष किंवा तरुण-तरुणी यांना परस्परांविषयी प्रेमभावना निर्माण होणे, ही वास्तविक निसर्गाची स्वतःची संस्कृती आहे- जी माणूस टाळू शकत नाही. कारण तो निसर्गाच्या प्रभावाखालीच असतो. या नैसर्गिक भावनेचा अतिरेक होणे हे जितके गैर आहे, तितकेच ती संयमाने व्यक्त करण्याचे मार्ग बंद करून एकूणच ती भावना दडपणे, हे त्याहून गैर आहे. "व्हॅलेंटाइन डे'ला मुला-मुलींनी एकमेकांना फूल वा भेटवस्तू देऊन मनातील मुग्ध भावनांना आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोचविण्याचा हा मार्ग निश्‍चितच सभ्य आणि उच्च अभिरुचिदर्शक आहे. अगदी होळीला तरुण-तरुणींनी एकमेकांच्या अंगाला रंग फासण्याच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत सन्माननीय आणि सभ्य आहे. ज्या वयामध्ये एकमेकांविषयीच्या आकर्षणाची निसर्गतः सुरवात होते, त्या वयाच्या तरुण मंडळींची ही प्राथमिक गरज आहे. म्हणून तरुण मुलामुलींना हा साधा आनंद घेऊ द्यावा. जर दहशतीने, हिंसेने या भावनेचे प्रकटीकरण आपण बंद पाडू लागलो तर दुसऱ्या मार्गाने चोरून, नजर चुकवीत तरुण मंडळी हे प्रयत्न करीत राहतील. मग ते नैतिक आहे का? पुण्या-मुंबईसारख्या शहरात, जिथे पालक नोकरीमुळे जास्त व्यस्त आहेत तिथे "सहलीला जातो सांगून एक दिवस एक रूम शेअर करून राहणे' असे मार्ग काही जण अवलंबितात. "व्हॅलेंटाइन डे'सुद्धा जर त्यांच्यापासून हिरावून घेतला, तर मग "रूम शेअर' करणे हाच पर्याय तरुणांसमोर राहील आणि ती संख्या वाढीस लागेल. खरे तर मनात असणाऱ्या राग व प्रेम या उद्रेकी भावनांचा योग्य वेळी, योग्य पद्धतीने निचरा होण्यानेच माणसाची त्या विकारातून मुक्तता होत असते आणि मनःस्वास्थ्य स्थिर राहते. मग असे मानसिक "फिटनेस आणि हेल्थ' जपणारे योग्य व सौम्य मार्ग संस्कृतीच्या सवंग किंवा चुकीच्या कल्पनांनी का बरं रोखून धरायचे? त्यापेक्षा "व्हॅलेंटाइन डे'चे मूळ स्वरूप तसेच ठेवून,

त्याला "भारतीय टच' दिला तर? ज्यांना ज्या प्रकारची प्रेमभावना व्यक्त करायची आहे, त्या रंगाचे फूल दुसऱ्याला देण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळणे म्हणजे "व्हॅलेंटाइन डे. असा तो दिवस आपण भारतीय करून घ्यावा. "व्हॅलेंटाइन डे'ला विरोध असणाऱ्यांनी तो दिवस बंद करण्यापेक्षा बदलण्याचा प्रयत्न करावा.

-मंगला सामंत, पुणे

प्रेमाचा उगम मेंदूत, ह्रदयात नव्हे


व्हॅलंटाइन डे साजरा होत असताना, येथील डॉक्टरांनी प्रेमिकांना धक्का दिला आहे. प्रेमाचा आणि ह्रदयाचे जवळचे नाते आहे अशी लोकांची कित्येक शतके समजूत आहे. यालाच धरून गाणी रचली गेली, कथा आणि कादंबऱ्या लिहील्या गेल्या. हार्ट अॅटॅक येण्याशीही काही अतिउत्साही मंडळींनी संबंध जोडला. मेरे दिलके टुकडे हजार हुए, इक इधर गिरा, एक उधर गिरा असेही म्हटले गेले. गुलाबी रंगाचे ह्रदय ही तर प्रेमाची, व्हॅलेंटाइन डेची निशाणी ठरली.

पण आता हे सारे बदलावे लागेल. कारण येथील डॉक्टरांनी पाहणीअंती निष्कर्ष काढला आहे की प्रेम हे मेंदूत उगम पावते. ह्रदयात नव्हे. मेंदूचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनीच हे म्हणणे मांडल्यामुळे त्याचा प्रतिवाद करणेही सोपे नाही. याची प्राथमिक पाहणी उंदरांवर केली गेली. त्या आधारे माणसाच्या मेंदूत प्रेमविषयक भावना कशा असतात याची कल्पना त्यांना आली.

माणसाच्या मेंदूत चार अतिसुक्ष्म भाग आहेत, जेथे प्रेमाचे सकीर्ट सुरू होते. यापैकी व्हेंट्रल टेगमेंटल एरिया म्हणजे व्हॅट हा या सकीर्टचा केंदबिंदू आहे. याचा आकार डोळयातील आसवासारखा असतो. नुकत्याच प्रेमात पडलेल्यांना त्यांच्या साथीदाराचे छायाचित्र दाखवले तेव्हा या भागात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून डॉक्टरांनी हा निष्कर्ष काढला आहे. अर्थात दोन दशकांनंतरही एकमेकावर उत्कट प्रेम करणाऱ्यांचाही व्हॅट हाच भाग महत्त्वाचा आहे असे आढळले.

व्हॅटमध्ये तयार होणारे डोपेमिन हे दव्य मेंदूच्या विविध भागांत धाडले जाते. जेव्हा तुम्ही कोणाला पटवण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा हे दव्य तयार होण्याची आणि ते पाठवण्याची गती वाढते. हे सारे व्यवस्थित घडत असते तेव्हा प्रेम यशस्वी होते, त्यात बिघाड झाला की माणसाच्या हातून काहीतरी भयानक घडण्याचा धोका असतो.

यामुळेच ज्यांचा प्रेमभंग झाला आहे अशांचाही डॉक्टरांनी अभ्यास केला. तेव्हा मेंदूच्या न्यूक्लीअस अॅकमबेन्स या भागातील हालचाली वाढतात असे आढळून आले आहे.मग ते वेडेपिसे होतात. अगदी मादक दव्याचे व्यसन लागलेल्यांना ते न मिळाल्याने नेमके जे होते तेच या प्रेमभंग झालेल्यांबाबत घडते.

यापुढे प्रेमाचे प्रतिक मेंदू दाखवले जाईल की ह्रदयाची जागा कायम राहील? काही असो, उद्या व्हॅलंटाइन डे साजरा करताना ह्रदयावर हात ठेवून प्रेमाच्या आणाभाका घ्या!

Wednesday, February 11, 2009

गांधीजींना भेटलेले तुकाराम!

अमेरिकन अध्यक्षांच्या जुन्या ऑफिसात गांधीजींचा फोटो होता. तो आताही असेल, तर माहित नाही. पण तर त्यांच्या शिकवणीचा आपल्या जीवनावर प्रभाव असल्याचे सांगतात. इसायलच्या दहशतवादाला दहशतवादाने उत्तर देऊन थकलेले पॅलेस्टीनचे लोक मुबारक अवाद यांच्या नेतृत्वात गांधीवादाची कास धरण्याची हिंमत करतात. ब्रिटिश लोक त्यांचा लाडका फुटबॉलपटू गॅरी लिनेकरचा पुतळा उभारण्याची मागणी करत आहेत. पण तो मात्र तिथल्या भारतीयांच्या सुरात सूर मिसळून म्हणतोय , गांधीजींचा पुतळा उभारा. दलाई लामा असोत की आँग सान स्यू की , सतत पराभव दिसत असूनही अहिंसेच्या मार्गावरचा त्यांचा विश्वास कणभरही कमी झालेला नाही. गेल्या दोनेक महिन्यांतल्याच या बातम्या आहेत. महात्मा गांधींच्या हत्येला पन्नासहून अधिक वर्षे झाली. पण त्यांचा जगभरातला प्रभाव कमी होत नाही. वाढतोच आहे.

पण गांधीजींवर कोणाचा प्रभाव होता ? गांधीजींनी सत्याचे प्रयोग करताना स्वत:ला मोहन ते महात्मा असे विकसित केले. त्यात ' आनौ भद: ' म्हणत गौतम बुद्धांपासून लिओ टॉलस्टॉयपर्यंत सगळ्या चांगल्या गोष्टींचे संस्कार स्वत:वर करून घेतले. त्यात एक संस्कार मराठी मातीतलाही होता. आपल्याला फारसा माहित नसलेला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या विचारांचा संस्कार.

गांधीजींनी तुकोबारायांचे संस्कार कसे पचवले याचा साक्षीदार आहे , गांधीजींनी तुकारामांच्या सोळा अभंगांचा इंग्रजीत केलेला अनुवाद. त्यांनी हा अनुवाद ' आश्रम भजनावली ' साठी केला होता. या भाषांतरात साहेबाच्या भाषेचा , त्या भाषेच्या विदेशी पार्श्वभूमीचा कोणताही अडथळा येत नाही आणि तुकोबांचे विचार थेट जसेच्या तसे वाचकांपर्यंत पोहोचतात. लेखक आणि अनुवादकामधले असे अद्वैत क्वचितच अनुभवायला मिळते. दोन सच्च्या वैष्णवांमधले हे अद्वैत. विशेष म्हणजे गांधीजींनी मराठी मातीत बसून हे लिहिलेय. त्यांना जिवे मारण्याच्या यशस्वी अयशस्वी योजना जिथे आखल्या गेल्या , त्या पुण्यातल्या येरवडा तुरुंगात बंदी असताना त्यांनी हे लिहिलेय.

तुकारामांच्या हजारो अभंगांमधून गांधीजींनी अनुवादासाठी अवघ्या सोळा अभंगांची केलेली निवड निव्वळ अप्रतिम आहे. मुळात त्यांनी आश्रम भजनावलीत देशभरातल्या विविध संतांच्या रचना एकत्र केल्या आहेत. त्यातून गांधीवाद उभा केला आहे. त्यामुळे त्यांनी आपले वाटतील असेच अभंग यात निवडले आहेत. पण मुळात त्यांना मराठी येत होते का , हा प्रश्न येतोच. डॉ. इंदुभूषण भिंगारे यांनी ' तुकाराम गाथे ' चे हिंदी भाषांतर केले होते. गांधीजींनी त्याला छोटी प्रस्तावना लिहिली आहे. ' मला फारसं मराठी येत नाही , तरी तुकाराम मला खूप प्रिय आहेत ', असे त्यात आवर्जून लिहिले आहे. मराठी अभंगांचे अर्थ समजून घेताना त्यांना अनेकांची मदत झाली असावी. महादेवभाई देसाई , स्वामी आनंद , काका कालेलकर , विनोबा , किशोरीलाल मश्रूवाला या गांधीजींच्या सावल्यांना मराठी उत्तम येत होते. त्यातले काहीजण अनुवादाच्या प्रसंगी येरवड्यात त्यांच्या सोबतही होते. त्यांनी शब्दांचे अर्थ सांगितले असतील. पण या हृदयीचे त्या हृदयी पोहोचलेला भाव ट्रान्स्लेट होण्यासाठी हवे असते ते अद्वैत. ते या दोन महात्म्यांमध्ये निश्चित होते.

महाराष्ट्र आणि गुजरातेतली सांस्कृतिक देवाणघेवाण अनेक शतकांची आहे. तुकाराम गांधीजींपर्यंत पोहोचण्याचा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे संत नामदेव. नामदेवांनी सातशे वर्षांपूवीर् भागवत विचारांची ध्वजा आजच्या पाकिस्तानापर्यंत पोहोचवली होती. त्यांचे बराच काळ गुजरातेत वास्तव्य होते. त्यांनी गुजरातीत अभंगरचनाही केली आहे. त्याचा प्रभाव नरसी मेहतांसहित सर्व वैष्णव संतांवर स्पष्ट दिसून येतो. आणि नरसींचा प्रभाव पारंपरिक वैष्णव संस्कारांत वाढलेल्या गांधीजींवर होता. म्हणूनच तर नरसींच्या ' वैष्णव जन तो... ' याच्याशी अपार साम्य असलेल्या ' जे का रंजले गांजले... ' चा अनुवाद गांधीजी आवर्जून करतात.

' पापांची वासना नको दांवू डोळा... ' चे त्यांनी केलेले भाषांतर वाचताना गांधीजींना या अभंगात त्यांची तीन माकडे दिसली असतील असे वाटते. तेव्हा त्यांच्या अजेंड्यावर वरचे स्थान असणाऱ्या अस्पृश्यता निवारणाशी थेट भिडणारा ' महाराच्या सिवे , कोपे ब्राम्हण तो नव्हे ' हा अभंगही येथे आहे. वारकरी संप्रदायातील सर्व जातींचा संतमेळ्याचे वर्णन ' पवित्र ते कूळ... ' या अभंगात आहे. तशीच समाजातील सर्व घटकांमधील जागृती स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींना अपेक्षित होती , असे त्याचा अनुवाद वाचताना वाटते. ' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती... ' आणि ' जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती... ' हे प्रसिद्ध अभंग यात आहेतच. पण मोक्षालाही नाकारण्याची हिंमत दाखविणाऱ्या तुकोबांच्या रोकड्या तत्त्वज्ञानालाही येथे जागा आहे. तसेच भगवद्भक्ती आणि नाममहात्म्याचे महत्त्व सांगणाऱ्या अभंगांनाही. ' हेचि दान देगा देवा... ' आणि ' शेवटची विनवणी... ' या चटका लावणाऱ्या अभंगांनाही मानाचे स्थान दिले आहे.

पण फक्त हे अभंगच नाहीत , तर गांधीजींवरचा तुकारामांचा प्रभाव सिद्ध करणारे इतरही अनेक दाखले आहेत. त्यांच्या लिखाणात , वक्तव्यांत तुकारामांचा उल्लेख अनेकदा आलाय. त्यांचे समग्र साहित्य इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यात ' तुका ' असा इंग्रजी सर्च दिला की अनेक संदर्भ समोर येतात. एका ठिकाणी महाराष्ट्राचे वर्णन करताना ते म्हणतात , ' जिथे लोकमान्य टिळक महाराजांचा जन्म झाला , आधुनिक युगाचे नायक असलेल्या शिवाजी महाराजांची जी भूमी आहे , जिथे तुकारामांनी आपले कार्य केले , ती महाराष्ट्राची भूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्राइतकीच पवित्र आहे. ' आणखी एक महत्त्वाचा संदर्भ वाईच्या एका भाषणाचा आहे. त्यात असहकार आंदोलनाची तात्त्विक भूमिका समजावून सांगताना त्यांनी तुकारामांच्या ' कठीण वज्रास भेदू ऐसे ' अशा तत्त्वज्ञानाचा दाखला दिला आहे.

पुढे दलितांच्या सभेतील एका भाषणाचा संदर्भ येतो. त्यात हिंदूधर्माचे मोठेपण सांगताना त्यांनी हा ज्ञानेश्वर- तुकारामांचा धर्म चिरकाल टिकणार असल्याचे सांगितले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेकडे ओढल्या जाणाऱ्या दलितांनी हिंदू धर्म सोडू नये , अशी गांधीजींची कळकळ होती. कदाचित त्याचा संदर्भ याला असू शकेल. याच भाषणात तामिळ संत थिरुवल्लुवर यांची तुलना केवळ तुकारामांशीच होऊ शकते , असे अधोरेखित केले आहे. एका पत्रात ते लिहितात , ' तुकाराम , ज्ञानेश्वर , नानक , कबीर हे दैवी अवतार नव्हते का ?... गावांच्या विकासासाठी काम करणाऱ्या तरुणांनी तुकारामांसारख्या संतांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी. '

गांधीजींचे सुहृद गुरुदेव रवींदनाथ टागोरांनाही तुकारामाने मोहिनी घातली होती. ब्राह्मो समाजामुळे टागोरांचा महाराष्ट्राशी संबंध आला होता. त्या ब्राह्मो समाजाचे मराठी रूप असणाऱ्या प्रार्थना समाजाने तुकारामांच्या तत्त्वज्ञानालाच आधार बनवले होते. त्या प्रभावातून त्यांनीही तुकारामांचे बारा अभंग बंगालीत अनुवादित केले आहेत. शांतिनिकेतनातल्या कलाभवनचे प्रमुख आणि जागतिक कीतीर्चे चित्रकार नंदलाल बोस यांच्याकडून गांधीजींनी तुकारामांची चित्रे काढून घेतली होती. डॉ. भिंगारेंच्या तुकाराम गाथेच्या हिंदी अनुवादात ही चित्रे छापण्यात आली आहेत.

स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वारकरी विचारांचा वारसा मानणारी महाराष्ट्रातील एक पिढी गांधीजींकडे ओढली गेली. त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले. साने गुरुजी , तुकडोजी महाराज , दादा धर्माधिकारी , विनोबा भावे , अच्युतराव पटवर्धन , सेनापती बापट ही त्यातली काही महत्त्वाची नावे. या पिढीनेच साने गुरुजींच्या नेतृत्वात विठ्ठलमुक्तीसाठी मंदिरप्रवेशाचे आंदोलन केले. तुकारामांच्या विठोबाच्या मुक्तीसाठी गांधीजींचे तत्त्वज्ञान धावून आले. पण मुळात हे तत्त्वज्ञान तुकोबांच्या तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे होतेच कुठे ?