Thursday, September 30, 2010

एक 'होता' कारसेवक...

दहावी पास होऊन नुकताच कॉलेजविश्वात प्रवेश केला होता. डोंबिवली सोडून नाशिकला शिफ्ट झाल्यानं तसं मित्रांचं वर्तुळ फारसं नव्हतंच. त्यामुळे मग घरानजीकच्या संघशाखेवर नियमित जाणं सुरू झालं. अकरावीचा प्रवेश, संघशाखेवर होणारी बौद्धिकं, त्या माध्यमातून होणारी चर्चा, अभाविपच्या कार्यकर्त्यांशी होणारी ओळख, कॉलेजातील मित्रांमधील चर्चा, घरात चालणारी चर्चा, देशातलं एकंदर वातावरण, मंदिर-मशीद वाद... या सर्वांतून मत तयार होत होतं. आणि त्याच सुमारास अभाविपच्या कार्यकर्त्यांची कारसेवेला जाण्याची तयारी सुरू होती. तू येशील का ? आमच्या संघशाखेवरच्या गुरुजींनी अचानक प्रश्न विचारला. अर्थात घरच्यांना विचारून सांगतो असं उत्तर. घरच्यांचा प्रथम विरोध होता, मात्र थोरल्या बंधूंनी पाठिंबा दिला. झालं, जाण्याचं नक्की ठरलं.

३० नोव्हेंबर १९९२ रोजी दुपारी अभाविपतर्फे आमचे ३० जणांचे पथक पवन एक्स्प्रेसने अयोध्येला रवाना झालं. पथकात सर्वात लहान म्हणून आम्हा दोघा-तिघांचं जरा अतिकौतुक आणि काळजीची हमी. त्यामुळे निर्धास्त होतो. अयोध्येला जाऊन नेमकं काय करायचंय याचा काही पत्ता नव्हता. मात्र, प्रवासात हरिभाऊंनी (आमचे गटप्रमुख) आपल्या जाण्यामागची भूमिका विशद केली. रामाच्याच जन्मभूमीत अर्थात अयोध्येत राम कसा वनवास भोगतोय, आपण काय करायला हवं, प्रवासात प्रत्येक ठिकाणी दिसणारं-जाणवणारं वातावरण, त्यामुळे एकीकडे पक्कं मत तयार होत होतं. सौगंध राम की खाते है..., एक धक्का और दो..., ये तो एक झाँकी है..., अयोध्या की माटी..., अब तो नगारा बज ही गया है... या व अशा घोषणांनी वातावरण अंगात भिनत होतं. गाणी-घोषणा-बौद्धिकं मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश या प्रांतातून गाडीत चढणारी कारसवेकांची पथकं, ओळखी-पाळखी, पुन्हा चर्चा असं करत करत २ डिसेंबरच्या पहाटे अयोध्येला आम्ही पोहोचलो.

देशाच्या कानाकोप-यातून कारसेवक जमायला सुरुवात झाली होती. आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली उत्तरेकडील राज्ये अशी विविध ठिकाणांहून लाखो कारसेवक अयोध्यानगरीत पोहोचले होते-पोहोचत होते. आमची व्यवस्था रामनगरी नावाच्या एका मंडपात केली होती. शरयूतिरावरच राहण्याची व्यवस्था, थंडी प्रचंड, मात्र अंगात उत्साह. पथकात बहुतेकजण तरुणच. त्यामुळे दोनच दिवसांत प्रत्येकाशी चांगलीच गट्टी-भट्टी जमली. त्यामुळे आपण परक्या ठिकाणी आलोय असं वाटतंच नव्हतं. ३ डिसेंबरपासून सकाळी उठून शरयूत आंघोळ. विविध प्रांतातून आलेल्या कारसेवकांच्या ओळखी. मग कारसेवकांसाठी सुरू केलेल्या अन्नछत्रालयांत जाऊन खाणं-पिणं झालं की दिवसभर अयोध्येची भ्रमंती असा दिनक्रम सुरू झाला. दुपारपर्यंत भटकणं आणि मग सायंकाळी प्रत्यक्ष वादग्रस्त जागेपासून काही अंतरावर सुरू असलेल्या साधुसंतांच्या आखाड्यात जाऊन बसायचं. त्या ठिकाणी दिवसभर कोणाची ना कोणाची भाषणं सुरूच असायची. मग त्यात साध्वी ऋतंभरा, आचार्य गिरिराज किशोर, विनय कटियार, उमा भारती या धार्मिक ( ? ) नेत्यांचा समावेश असायचा. शेकडो वर्षांपासून रामाची जन्मभूमी कशी परकीयांच्या जोखडात अडकली आहे, समोर उभी असलेली वास्तू म्हणजे मूर्तिमंत कलंक, ती पाडून त्या ठिकाणी मंदिराची उभारणी करणं कसं समस्त हिंदूंचं परमकर्तव्य आहे, त्यासाठी आपण इथे जमलो आहोत... अशा आशयाची ती भाषणं. मग त्यात आतापर्यंतच्या सर्व सरकारांचा उद्धार, हिंदुत्त्ववादी सरकार सत्तेत आल्यास रामराज्य कसं अवतरणार याची स्वप्न दाखवणं अशा सर्व मुद्यांचा या नेत्यांच्या भाषणात समावेश असायचा.

अयोध्येत फिरतानाही पोलिसही कोणाला हटकत नव्हते. त्यामुळेच अरे बघता काय, सामील व्हा... अशा घोषणा त्यांच्यासमोर तारस्वरात देणं जमत होतं. प्रत्यक्ष कारसेवेची तारीख जसजशी जवळ आली तसतसं अयोध्येतलं वातावरण तापू लागलं होतं. आमच्या फिरण्यावर बंधन घातली जात होती. आमच्याबरोबर सातत्याने कोणीतरी वरिष्ठ राहील याची काळजी घेतली जात होती. सूचना, कोणी कुठे कसं जायचं, हरवलं तर कुणाशी कसा संपर्क साधायचा, गटातील प्रत्येकाला दिलेला संकेतांक, निरनिराळ्या प्रांतातील कारसेवकांशी चर्चा, वादग्रस्त जागेभोवती पोलिसांचे, सुरक्षा दलांचे वाढत जाणारे सुरक्षाकवच, नेत्यांच्या भाषणात येऊ लागलेला आक्रमकपणा सारंसारं हे एका अघटिताची जाणीव करून देत होतं. मात्र, त्यावेळी कट्टरपणा एवढा अंगात भिनला होता की जे होतंय, जे होणार आहे ते देशहिताचंच आहे हा ठाम विश्वास बनत चालला होता. आक्रमक नेत्यांची भाषणं अधिकाधिक आक्रमक होत चालली होती, कारसेवकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, मंदिर वही बनाएंगे..चा जयघोष टिपेला पोहोचू पाहत होता, सर्व शासकीय यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून पहात होती, त्यामुळे सर्वजणच निश्चिंत होते.

५ डिसेंबरची अख्खी रात्र वादग्रस्त जागेनजीकच काढली. ६ डिसेंबरला पहाटे आमच्या निवासात (म्हणजे उघडा मंडपच तो) परतलो. मात्र, सकाळी हरिभाऊंनी आम्हाला सर्वांना लवकरच उठवलं. आन्हिकं आटोपून चर्चासत्राला (म्हणजे मीटिंगला) हजर राहण्याचं ठरलं. सर्वजण सकाळी साडेआठला चर्चासत्राला जमले. कोणी कुठे थांबायचं, कोणी कुठे जायचं, कोणाशी संपर्क साधायचा, कोणी मागे थांबायचं सारी व्यूहरचना झाली. सकाळी दहापासूनच सर्वांनी वादग्रस्त जागेच्या (ते आमच्या ठिकाणापासून किमान दोन-तीन किमी अंतरावर होतं) परिसरात जायचं ठरलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर वातावरणातला उन्माद जाणवत होता. समोरच्या दुमजली इमारतीच्या गच्चीवर अडवाणी, वाजपेयी, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, विहिंपचे नेते अशोक सिंघल आदी रथी-महारथी नेते जमले होते. सर्वांची भाषणे सुरू होती. एकीकडे रामनामाचा जप, रामाचा जयघोष, मंदिर वही बनाएंगे, एक धक्का और दो... या घोषणांना जोर चढत होता. दुपारपर्यंत सर्व नेत्यांची भाषणं झाली. दुपारच्या जेवणासाठी आम्हा कार्यकर्त्यांना मंडपात जाण्यास सांगण्यात आले आणि पुढची सूचना येईपर्यंत तिथेच थांबायचे आदेशही...

दुपारी तीन-चारच्या दरम्यान मंडपात गोंधळाला सुरुवात झाली. गुम्बत गिरा दिया... कारसेवकोंने मस्जिदपर धावा बोल दिया... बोलो सियावर रामचंद्र की जय... बाबरी ध्वस्त हो गई... रामजी की सेना चली... अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आम्हीही मुठी आवळून घोषणाबाजी करत प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वरिष्ठांनी अडवलं. समोर पोलीस बंदोबस्तही वाढल्याचं दिसत होतं. सायंकाळी उशिरा अखेरीस आम्हाला वादग्रस्त ठिकाणी वरिष्ठांनी नेलं. सगळीकडे धुळीचं साम्राज्य, वादग्रस्त जागेभोवतालची सर्व बॅरिकेड्स तोडून कारसेवक आत घुसल्याचं स्पष्ट होतं, पाडलेल्या वास्तूवर घाव घालण्याचं काम सुरूच होतं, वाहत्या गंगेत आम्हीही हात धुवून घेतले. पराक्रमाचं प्रतीक म्हणून दोन विटा घेऊन तिथून बाहेर पडलो. जीवनाचं सार्थक झाल्याचं त्या क्षणी तरी वाटलं. वातावरण अनुभवण्यासाठी अयोध्येत फिरायचं होतं. मात्र कर्फ्यु असल्याने मंडपाकडे परतावं लागलं. काम फत्ते झालंय, नाशिकला परतण्याचं ठरलं. पोलिसांच्या गराड्यात कारसेवकांचे जत्थे अयोध्या स्टेशनकडे परतत होते. मिळेल त्या गाडीने फैजाबाद गाठण्याची, पर्यायाने घरी परतण्याची प्रत्येकाची घाई चालली होती. घोषणांनी अयोध्या दुमदुमत होती. तिकडे देशात काय परिस्थिती उद्भवली होती किंवा उद्भवणार आहे, आणि आपण नेमकं काय केलंय हे समजायला बराच उशीर लागला...


अयोध्येतून परततानाच त्याची प्रचिती आली. फैजाबादमध्ये आमच्या गाडीवर दगडफेक झाली तेव्हा परिस्थितीची जाणीव झाली. मात्र, गांभीर्य कळलं नाही... घरी फोन करून ख्यालीखुशाली कळवली होतीच. घरचे चिंताक्रांत, नाशकात कर्फ्यू लागल्याचं समजलं. कर्फ्यू तोडून विजयसभा झाल्याचंही कळलं. ८ डिसेंबरला घरी परतलो त्यावेळी आपण काय केलंय त्याची जाणीव झाली. बाबरीच्या पतनानंतर देशातलं वातावरण ढवळून निघालं होतं. पुढचा सारा इतिहास ज्ञात आहेच...

....

आज १८ वर्षांनंतर कारसेवकाच्या आपल्या भूमिकेकडे त्रयस्थपणे पाहताना मन निराश होतंय. तो उन्माद, तो जोश, तो कट्टरपणा, तो साहसवाद... सारंसारं गळून पडलंय. अर्थात ही मनोवस्था एका रात्रीत बदललेली नाही. बाबरी पतनानंतर देशात, मुंबईत उसळलेली दंगल, मुंबईतली बॉम्बस्फोट मालिका, गुजरातची दंगल, ‘ ते ’ आणि ‘ आपण ’ यात रुंदावलेली दरी, हजारो निरपराधांचे बळी, दुभंगलेली मने, राजकारण्यांचा स्वार्थीपणा, देश म्हणून झालेलं नुकसान, हाती काल लागलं याची कॅलक्युलेशन या सर्वाची टोटल एकच झाली, जे झालं, जे केलं ते नक्कीच कौतुकास्पद नव्हतं. काय मिळालं असं करून हाच एक प्रश्न मनात उरलाय, उरतोय. धर्म, जात, धर्माभिमान, जाज्ज्वल्य हिंदुत्त्ववाद, हे सारं एका ठिकाणी आणि मानवता, देश, धार्मिक सहनशीलता, सहजीवन, देशाचा विकास, तरुणांच्या समस्या हे दुस-या बाजूला. दोन्ही एका तराजूत मोजलं तर दुस-या बाजूचे पारडे जड राहील हे नक्की.

मग काय मिळवलं असं करून हा प्रश्न अद्याप निरुत्तर आहेच. त्यांचं आणि आपलं सहजीवन अपरिहार्य आहे याची खात्री पटत चालली आणि पूर्णपणे पटली आहे. मग काय मिळतं असं करून. पाण्यात काठी मारल्याने ते दुभंगणार नाही हे माहीत असूनही का मारायची काठी. वरच्या तरंगांसाठी ? , मंदिर-मशीद नाही बनली तर सर्वसामान्यांचं कुठे अडलंय, गेल्या अठरा वर्षांत कोणाचं अडलं नाही आणि यापुढेही अडणार नाही. का म्हणून पुन्हा तेच वातावरण तयार करायचं, कोणासाठी, वाढती बेरोजगारी, दहशतवाद, शेजारी राष्ट्रांच्या वाढलेल्या भारतविरोधी कारवाया ही संकटं कमी आहेत का ? उद्या अयोध्येचा निकाल काहीही लागला तरी सौगंध राम की खाते है पुन्हा म्हणावसं वाटेल असं वाटत नाही. झालं ते पुरे झालं. अर्थात हा विचार दोन्ही बाजूने होणं महत्त्वाचं आहेच. तसा होतही आहे. दोन दशकाच्या अनुभवातून आपण एवढे तरी शिकलो हे समाधानाचं. देश म्हणून उभं राहण्यासाठी सहजीवन, धार्मिक सहनशीलता हेच महत्त्वाचं आहे याची खात्री पटलीय. धर्माचा अभिमान बाळगावा परंतु तो एका विशिष्ट चौकटीत राहून बाळगायला हवा याची समज खूप आधीच आली आहे. तसाच तो इतर धर्मांचा आदर बाळगावा हे मतही पक्कं झालंय. त्यातच आपल्या देशाचं हित सामावलंय...

जय श्रीराम !!!


विनय उपासनी.....

Wednesday, September 29, 2010

स्त्रीप्रश्नाची आंबेडकरी उकल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे उद्धारकतेर्, असा
केला जातो. मात्र हिंदू कोड बिलाच्या वादात बाबासाहेबांना कायदेमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता हे वास्तव सोयीस्करपणे विस्मृतीत ढकलले जाते. जातीव्यवस्थेने मनुष्यत्वही नाकारलेल्या डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांच्या हिताची तरतूद करणाऱ्या हिंदू कोड बिलाच्या समर्थनासाठी आपले सारे नैतिक बळ पणाला लावले या एकाच बाबीसाठी भारतीय स्त्रियांनी तरी त्यांच्या ऋणात आजन्म राहायला हवे. स्त्रियांना समान दर्जा देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायला हवे.

' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अँड विमेन्स क्वेश्चन्स' हे ललिता धारा यांनी डॉ. एस. आर. कांबळे यांच्या विशेष सहकार्याने संपादित केलेले पुस्तक त्यादृष्टीने उपयुक्त ठरावे. पुष्पा भावे यांनी स्त्रीविषयक प्रश्ान् व चळवळींचा घेतलेला चिकित्सक आढावा, स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व संविधानाच्या चौकटीत बसवण्याचा डॉ. आंबेडकरांचा ध्यास उलगडून दाखवणारे डॉ. सुरेश माने यांचे विवेचन, भारतीय स्त्रीमुक्तीसंदर्भात डॉ. आंंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिमा परदेशी यांनी केलेले विश्लेषण तसेच आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांच्या कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या 'आम्हीही इतिहास घडवला' या उमिर्ला पवार आणि मीनाक्षी मून यांच्या पुस्तकातील वंदना सोनाळकर यांनी अनुवादित केलेला संपादित अंश असे वैचारिक खाद्य या पुस्तकाने वाचकांना उपलब्ध करून दिले आहे.

बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य या नात्याने १९२८मध्ये नोकरदार महिलांना प्रसूतीची भरपगारी रजा देणाऱ्या विधेयकाला डॉ. आंबेडकरांनी दिलेले समर्थन, कुटुंबनियोजनाची साधने महिलांनाही उपलब्ध करून द्यावीत असा १९३८मध्येच धरलेला आग्रह या महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करत संपादक ललिता धारा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीप्रश्ान्विषयक कार्याची पुरेशी दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे. नागपूर येथे २० जुलै १९४२ रोजी भरलेल्या 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस विमेन्स कॉन्फरन्स'मध्ये स्त्री-पुरुषांना घटस्फोटाचा समानाधिकार,बहुपत्नीत्वास प्रतिबंध, स्त्री-पुरुषांसाठी कामाच्या जागी अनुकूल सोयीसुविधा असे ठराव संमत करण्यात आले. पुढे व्हाइसरॉयच्या कार्यकारी समितीत मजूर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. आंबेडकरांंनी प्रयत्न केले होते, याकडेही त्या लक्ष वेधतात.

जातीव्यवस्था आणि स्त्रीदास्य यांच्या साहचर्याचा धागा पकडत पुष्पा भावे यांनी योनीशूचितेची संकल्पना, प्रतिलोम विवाहांवरील सामाजिक प्रतिबंध, देवदासी-मुरळ्यांची प्रथा, रस्त्यावरून चालताना ब्राह्माण दृष्टीस पडल्यास शूद स्त्रीने आपला पदर पायघडीसारखा पसरण्याची दक्षिण भारताच्या काही भागांतील प्रथा या समाजव्यवहाराची चिरफाड केली आहे. डॉ. आंबेडकरांच्या प्रभावामुळे जानोजी खंदारे, गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे यांसारखे कार्यकतेर् चळवळीला लाभल्याचे त्या नमूद करतात. डॉ. आंबेडकरांनी अन्यायग्रस्ततेचा टाहो न फोडता स्त्रियांना जातीअंताच्या लढाईत सक्रिय व्हावे असे म्हटले.

स्त्रियांना आथिर्क स्वातंत्र्य मिळाले की त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होईल या आजही प्रभावी असलेल्या तत्कालीन विचारांचा प्रतिवाद डॉ. आंबेडकरांनी कसा केला होता त्याचा संदर्भ डॉ. सुरेश माने यांच्या लेखात आढळतो. 'गरीब घरातल्या स्त्रिया कष्ट करून रोजगार कमावतात; पण त्यामुळे त्या स्त्रियांवरील मर्यादा फारशा हटल्याचे मात्र दिसत नाही' हे डॉ. आंबेडकरांचे निरीक्षण नोंदवून प्रश्ान् स्त्रियांच्या दुय्यम स्थानाचा असल्याचे ते म्हणतात. हिंदू कोड बिलावरून घटनासमितीत उठलेले वादळ, अनेकांचेे त्यानिमित्ताने उघड झालेले खरे चेहरे यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. तर सतीप्रथा, विधवापण वागवण्याची सक्ती, बालविवाह अशा पराकोटीच्या क्रूर, विषम रूढींना शास्त्रसंमती देणारी मनुस्मृती दहन करण्याचे डॉ. आंबेडकरांचे दूरदशीर् धारिष्ट्य स्त्रियांनी प्रमाण मानायला हवे, असे प्रतिमा परदेशी आपल्या लेखात म्हणतात. पुस्तकाला पूरक परिशिष्टे आहेत.