Thursday, March 26, 2009

अडवाणींचे वस्त्रहरण!

पंतप्रधान मनमोहन सिंग हे सहसा कुणाबद्दल अपशब्द काढणारे गृहस्थ नाहीत, तरीही ते राजकारणात आहेत, हे खरे तर एक आश
्चर्यच म्हणावे लागेल! कारण गेल्या काही वर्षांत आपल्या देशात राजकारण हा केवळ बेफाम आणि बेछूट विधाने करणाऱ्यांचाच नव्हे तर तशी प्रत्यक्ष कृती करणा-यांचा 'खेळ' झाला आहे. त्यामुळेच गेली जवळपास पाच वर्षे त्यांच्यावर 'दुबळे पंतप्रधान', 'सोनिया गांधींच्या हातातील बाहुले' असे अनेक आरोप भारतीय जनता पक्ष करत असूनही त्यांनी त्यांकडे दुर्लक्ष केले होते. पण आता निवडणुकीचे शंख फुंकले गेल्यावर मात्र इतके दिवस शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे बाहेर काढणे त्यांना भाग पडले असून लढाईच्या पहिल्या फेरीतच त्यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांचे पुरते वस्त्रहरण केले आहे. आपण इतके दिवस बोलत नव्हतो, याचा अर्थ आपण 'दुबळे' होतो असा नाही, तर केवळ सभ्यता आणि सुसंस्कृततेच्या मर्यादांचे भान असल्यामुळेच आपण गप्प राहिलो, हे अप्रत्यक्षरीत्या सूचित करतानाच पंतप्रधानांनी केलेला अडवाणींच्या गेल्या दोन दशकांतील राजकारणाचा 'पंचनामा' प्रचारमोहिमेत भाजपला महाग पडू शकतो. अयोध्येतील ऐतिहासिक बाबरी मशीद जमीनदोस्त करण्यापलीकडे अडवाणींने केले काय, असा सवाल विचारून त्याचे उत्तरही देऊन ते मोकळे झाले आहेत. अडवाणींच्या गृहमंत्रीपदाच्या कारकिर्दीतच इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले आणि अझर मसूद या कट्टर अतिरेक्याला इमान-इतबारे कंदहारला नेऊन मुक्त करावे लागले. त्याचीच परिणती संसद व लाल किल्ल्यावरील हल्ल्यात झाली आणि गुजरातच्या हिंसक दंगली तर अडवाणींच्या 'अध्यक्षतेखाली' पार पडल्या, अशा तिखट शब्दांत पंतप्रधानांनी अडवाणींच्या 'कर्तृत्वा'चा पाढा पत्रकारांपुढे वाचल्यानंतर भाजपचे अनेक बोलके पोपट रिंगणात न उतरते, तरच नवल! पण त्यांच्यापुढेही मनमोहन सिंग यांनी दिलेल्या या दाखल्यांना उत्तर द्यायला शब्द नव्हते. त्यामुळेच त्यांना टीकेचा रोख हा काँग्रेसच्या जाहीरनाम्याकडे वळवणे भाग पडले.

अर्थात, त्यामुळे पंतप्रधानांच्या विधानांमधील सत्यच अधोरेखित झाले. एकेकाळी या देशात सभ्य आणि सुसंस्कृत राजकारण्यांच्या हातात देशाच्या ध्येय-धोरणांची सूत्रे होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या उदारमतवादी नेत्याकडे देशाचे नेतृत्व होते आणि अन्य पक्षांतही अटल बिहारी वाजपेयी, अशोक मेहता, बॅरिस्टर नाथ पै, कॉ. एस. ए. डांगे, नंबुदीपाद, बी. टी. रणदिवे असे विचारी नेते होते. त्यामुळे केवळ संसदीय राजकारणालाच नव्हे, तर समाजाच्या अगदी तळाच्या स्तरापर्यंत चालणाऱ्या गावकारणाला काही एक उंची आणि दिशा असे. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे समाजाच्या हिताच्या अनेक प्रश्नांवर हे नेते एका आवाजात बोलत असत. पण गेल्या दोन दशकांत देशातील राजकारणाचा स्तर पुरता बदलून गेला आहे. धार्मिक विद्वेष व सामाजिक तेढ हा मते मिळवण्याचा राजमान्य मार्ग बनून गेल्यापासून सभ्यता आणि सुसंस्कृतपणा यांची कदर उरली नाही. १९८० आणि ९०च्या दशकांत भाजपपरिवाराने हिंदुत्वाच्या नावाने समाजाचे दोन तुकडे पाडले. पुढे अडवाणी यांच्या उपस्थितीत अयोध्येतील बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. तेव्हापासून हिंसा हा भाजपपरिवाराच्या समाजकारणाचा गाभा बनून गेला. त्यामुळेच २००४ मध्ये भाजपच्या हातातून देशाची सूत्रे काँग्रेसकडे आली, तेव्हा सर्वांच्या अपेक्षा फोल ठरवत सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारून एक मोठा धक्का दिला होता. त्यांनी सिंग यांची देशाचे नेतृत्व करण्यासाठी निवड केली, तो आणखी एक सुखद धक्का होता, हे पंतप्रधानांनी आपल्या पाच वर्षांच्या कारभारातून दाखवून दिले आहे. त्यांच्या कारभाराबद्दल बोलणे कठीण असल्यामुळेच ते 'दुबळे' असल्याची टीका भाजपला सातत्याने करावी लागत आहे. पण 'दुर्बलां'चेही काही एक सार्मथ्य असतेच आणि ते त्यांच्या सभ्य व सुसंस्कृत वर्तनात असते. त्या अर्थाने विचार करावयाचा तर महात्मा गांधी हे या देशातील सर्वात दुबळे नेते म्हणावे लागतील! पण गांधीजींची हत्या हा अभिमानबिंदू मानणाऱ्या अतिरेकी राजकारण्यांना केवळ हिंसा हेच सार्मथ्य वाटत असले, तरी या देशातील एक फार मोठा गट हा हिंसेच्या विरोधात असून तो सभ्यता आणि सुसंस्कृतपणाबरोबरच देशाची एकता आणि सर्वसमावेशकता यांनाही महत्त्व देतो, हे अडवाणी आणि त्यांच्या चेल्यांनी ध्यानात घ्यावे हे बरे.

1 comment:

Shardulee said...

Totally agreed, am too typical congress person, i don't like these so called religious farcist parties, they can just talk nonsense and do nonsense, no proper vision at all.