Monday, April 6, 2009

केदारनाथचे दर्शन


महाकवी कालिदासाने आपल्या ‘कुमारसंभव’ या महाकाव्याच्या पहिल्याच श्लोकात नगाधिराज हिमालयाला ‘देवतात्मा’ म्हणून गौरवले आहे. हिमालयातील उच्च वातावरण म्हणजे एक नि:शब्द शक्ती, पवित्र शांततेचे एक मूर्त स्वरूप आहे. ज्ञानी महात्मे सांगतात, ‘‘सूक्ष्म व कारणदेहात देवदेवता हिमालयाच्या गिरिशिखरावर संचार करत असतात, वास्तव्य करत असतात.’’ देवाधिदेव महादेवाचे तर हे सर्वात प्रिय निवासस्थान. हिमालय ही भरतखंडाची पुण्यभूमी आहे, देवभूमी आहे. हिमालयाच्या महान, उत्तुंग, नित्य हिममय शिखरांच्या सान्निध्यात केदारनाथचे मंदिर शतकोनीशतके उभे आहे. बारा ज्योर्तिलिंगातील हे ११ वे ज्योर्तिलिंग! ‘‘आयुष्यात एकदा तरी गंगास्नान घडावे व बद्रिनाथ-केदारनाथचे दर्शन व्हावे,’’ असे स्वप्न प्रत्येक भाविक आपल्या उराशी बाळगून असतो.
महाभारत, स्कंदपुराण, लिंगपुराण, वामनपुराण, ब्रह्मपुराण, वायुपुराण इ. अनेक पुराणांत केदारनाथचे महात्म्य वर्णले आहे. आख्यायिका-कथा सांगितल्या आहेत. या पवित्र स्थानाची महती आदिमायाला पार्वतीला सांगताना श्रीशंकर म्हणतात, ‘‘मी
ज्याप्रमाणे अनादिकाळापासून या विश्वात वावरतो, त्याप्रमाणे ही केदारभूमी प्राचीन आहे. ब्रह्मरूप धारण करून याच ठिकाणी मी सृष्टी निर्मितीची रचना केली.’’ तेव्हापासून ही केदारभूमी अस्तित्वात आहे. ही देवदुर्लभ पवित्रभूमी आहे.
या स्थानाशी निगडित अशा दोन कथा सांगितल्या जातात. जेव्हा ईश्वराने मानवी सृष्टी निर्माण केली तेव्हा तिच्या रक्षणार्थ नरनारायणांना त्याने पृथ्वीवर पाठवले. जगाच्या कल्याणासाठी नरनारायणांनी गंधमादन पर्वतावर आशुतोष महादेवाची तपोसाधना केली. श्री शंकर प्रसन्न झाले. त्यांनी नरनारायणांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा नरनारायणांनी श्रीशंकराला विनंती करून सांगितले, ‘विश्वकल्याणासाठी आम्ही आपले स्मरण केले. आपण या पर्वतात सदेह प्रकट स्वरूपात कायम वास्तव्य करावे. आपल्या दर्शनातून संसारी मानवाला मुक्ती लाभेल.’’ श्रीशंकराने ही विनंती आनंदाने मान्य केली.


तर दुसरी कथा महाभारताशी निगडित आहे. महाभारतातील युद्धात झालेला महासंहार, कुलक्षय यामुळे पांडवांना खूप नैराश्य आले. महर्षी व्यासांच्या उपदेशानुसार महादेवाच्या दर्शनासाठी ते काशीला निघाले. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी श्रीशंकर हिमालयात निघून गेले. पांडवांना हे समजताच ते दु:खी झाले व त्यांनी पण हिमालयाकडे प्रस्थान केले. एकवेळ अशी आली की ते श्रीशंकराच्या खूप जवळ पोहोचले. आता पांडवांना चुकवण्यासाठी महादेवाने महिषरूप धारण केले व जवळ असलेल्या म्हशींच्या कळपात प्रवेश केला. हे भीमाच्या लक्षात आले. त्याने रेडय़ाला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रेडय़ाने जमिनीत प्रवेश केला व भीमाच्या हाती रेडय़ाचे फक्त शेपूट आले. पण यामुळे भूगर्भात प्रवेश केलेल्या रेडय़ाच्या हालचालीवर प्रतिबंध आले व त्याच्या शरीराचे पाच भाग भूपृष्ठावर प्रगट झाले. त्यापैकी पाठीचा भाग म्हणजे केदारनाथ, नाभीस्थळ- मद्महेश्वर, बाहु- तुंगनाथ, नेत्र- रुद्रनाथ व जटा म्हणजे कल्पेश्वर! ही पाच पवित्र स्थाने ‘पंचकेदार’ म्हणून ओळखली जातात. तुंगनाथ वगळता ही सर्व स्थाने मुख्य रस्त्यापासून खपू दूर गिरीकुहरात दडली आहेत. केदारनाथ वगळता इतर ठिकाणी प्रवासी सोईसुविधा, पण फारशा उपलब्ध नाहीत. आहे ते फक्त निसर्गाचे भान हरवून टाकणारे रूप! येथील निसर्गाचे सौंदर्य, भव्यता व उदात्तता अभिजात आहे.

इक्ष्वाकु कुळातील पुण्यशील भगीरथ राजाच्या कठोर तपोसाधनेने देवलोकीची गंगा पृथ्वीवर अवतरली. तिच्या अमोघ वेगापासून पृथ्वीचे रक्षण व्हावे म्हणून श्रीशंकराने तिला आपल्या मस्तकावर धारण केले व जटात बद्ध केले. मग त्यांनी सुमेरु पर्वतावर प्रस्थान केले व जटाबद्ध असलेल्या गंगेला मुक्त केले. गंगेचा प्रवाह सात धारांतून भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी, जडगंगा, ऋषिगंगा, भिलनगंगा व सरस्वती नावाने गिरीशिखरावरून झेपावू लागला. या सातही धारांचा संयुक्त प्रवाह देवप्रयागपाशी एकत्र आला व गंगा नावाने सागराकडे धावू लागला. गंगेच्या जटातील वास्तव्यामुळे श्रीशंकराच्या जटा ओल्या झाल्या. दलदलीसारखी अवस्था झाली. अशा दलदलीला ‘केदार’ म्हणून संबोधतात. अशी दलदल मस्तकावर धारण करणारा नाथ- तो ‘केदारनाथ’. केदारनाथ या नावाची उत्पत्ती काही ग्रंथात अशी सांगितली आहे.
ऋषिकेश ते केदारनाथ हे अंतर २२३ कि.मी.! त्यापैकी ऋषिकेश ते गौरीकुंड हा २०९ कि.मी.चा बसप्रवास आहे तर गौरीकुंड ते केदारनाथ हे १४ कि.मी. अंतर पायी पार करावे लागते. या सर्व मार्गावर पारंपरिक लोककथांची लेणी मिरवणारी, वैशिष्टय़पूर्ण मंदिरे असलेली अनेक गावे आहेत. त्यांच्या भोवती असलेल्या दंतकथा व मिथकं मनाला मंत्रमुग्ध करून टाकतात.
गौरीकुंडची उंची आहे १९८१ मी.! घनदाट वृक्षराजीत दडलेली ही छोटीशी वस्ती! इथे सपाट जागा अशी नाहीच. आदिमाया गौरीने शिवाच्या प्राप्तीसाठी या ठिकाणी तपश्चर्या केली होती, अशी एक श्रद्धा! विघ्नहर्त्यां गणेशाचे हे जन्मस्थान समजले जाते. येथील मंदिरात गौरी व शंकराच्या धातूमूर्ती आहेत. मंदिरासमोर गरम पाण्याची कुंडे आहेत. गौरीकुंडपासून केदारनाथची पदयात्रा सुरू होते. त्यामुळे यात्रेकरूंना लागणाऱ्या सामानाची व वस्तूंची खूप दुकाने येथे आहेतच, पण राहण्याच्या जागा तसेच जादा सामान ठेवण्यासाठी क्लॉकरूमची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्व प्रवास पूर्ण चढणीचा आहे. बरोबर साथ असते ती मंदाकिनीची व उधळलेल्या निसर्गाची! हा सर्व रस्ता प्रशस्त व पूर्ण सुरक्षित आहे. जागोजागी चहा-फराळाची दुकाने, प्रसाधनगृहे, वेळी-अवेळी होणाऱ्या पावसापासून, हिमवृष्टीपासून संरक्षणासाठी निवारे उपलब्ध आहेत. सर्व मार्गावर भाविकांची वर्दळ सुरू असते. ‘जय केदारनाथजी की’ हा पवित्र घोष सतत कानावर पडत असतो. साधारण २ कि.मी. चालल्यावर येथे ‘जंगलचट्टी’ व मग ४ कि.मी. अंतरावर येते भैरवनाथचे छोटेसे मंदिर! भैरवनाथला केदारनाथचा द्वारपाल म्हणून ओळखले जाते. व मग १ कि.मी. अंतरावर येतो ‘रामपाडा’. रामपाडय़ाची उंची आहे २५९१ मी.! या ठिकाणी राहण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. सर्व परिसर हिरवाईने नटलेला, जवळच मंदाकिनीचा देखणा प्रपात! मध्येच बर्फाचा शुभ्र गालिचा, आसमंतात पसरलेली पर्वत शिखरे! अवचित मोनालसारखे देखणे पक्षी दर्शन देतात. या सप्तरंगी मोनाल पक्ष्याला स्वर्गीय सौंदर्य लाभले आहे. डोक्यावर मोरासारखा तुरा, निळ्या हिरव्या पाचूचे रूप धारण केलेला हा पक्षी मोरापेक्षा देखणा दिसतो. नजरेचे पारणे फेडतो.रामपाडय़ापासून ५ कि.मी. अंतरावर येते ‘गरुडचट्टी’! या पुढचा २ कि.मी.चा रस्ता मात्र बराचसा सपाटीचा आहे. थोडे अंतर पुढे चालल्यावर साधारण त्रिकोणी आकाराच्या पठारावर वसलेल्या केदारपुरीचे व केदारनाथ मंदिराच्या सुवर्णकळसाचे प्रथम दूरदर्शन होते. आसमंतात पसरलेल्या हिमाच्छादित पर्वत शिखराकडे दृष्टी वळताच मनात विचार येतो की, या अपरंपार व अगम्य अशा शुभ्र हिमराशी आपल्या धवल स्मिताने अनंताचा महिमा व्यक्त करत आहेत. या शुभ्र ज्योतिर्मय, सुविशाल हिमराशीपासून तेज:पुंज दिव्य अशी असंख्य किरणे प्रसृत होऊन साऱ्या भूमंडळाला उजळून टाकत आहेत. हा हिमालय अनंत तत्त्वांनी परिपूर्ण आहे. मग वाटू लागते या मंदिरासाठीच या उंच शिखरांचा अग्रभाग नगाधिराज हिमाद्रीने मुद्दाम सपाट बनवला आहे.
मंदाकिनी नदीवरील लोखंडी पूल ओलांडून आपण केदारनाथ गावात प्रवेश करतो. गावात एकच रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला निवासाच्या व्यवस्था, चहा-फराळाची व इतर सामानाची दुकान. हा रस्ता गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या केदारनाथ मंदिरात घेऊन जातो. केदारकंठ, हनुमान टोप, भृगुपंथ इ. स्वर्गरोहिणी मालिकेतील शुभ्र हिमशिखरांच्या पाश्र्वभूमीवर उभे असलेले हे केदारनाथाचे मंदिर अतिशय शोभिवंत दिसते. हिमालयाची व्याप्ती पाच खंडात सांगितली जाते. त्यातला मध्यवर्ती भाग म्हणजे ‘केदारखंड’. या मध्यवर्ती भागाच्या केंद्रबिंदूवर केदारनाथ मंदिराचे स्थान आहे, असे मानले जाते.
कत्युरी शैलीतील जवळजवळ ६५ फूट उंचीच्या या मंदिराची स्थापना ८-१० फूट उंचीच्या चौथऱ्यावर केली आहे. प्रत्येक शिवमंदिराप्रमाणे या ठिकाणीसुद्धा मंदिराबाहेर एक खूप मोठा नंदी विराजमान आहे. याच ठिकाणी आशुतोष महादेवाला नंदीची प्राप्ती झाली व त्याने नंदीचा वाहन म्हणून स्वीकार केला, अशी आख्यायिका सांगितली जाते.
गाभारा व दोन दालनांचा सभामंडप अशा या मंदिराची रचना असून गाभाऱ्यात एखाद्या शिखराप्रमाणे भासणारा ग्रेनाईटसारखा पाषाणखंड आहे व हेच नैसर्गिक शिवलिंग! गाभाऱ्यात सदैव तेला-तुपाचे दिवे प्रज्वलित केलेले असतात. बाहेरील सभामंडपाच्या भिंतीत काही आकृत्या कोरल्या आहेत. त्या पांडवांच्या, द्रौपदी व कुंतीच्या मूर्ती आहेत, असे मानतात. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर द्वारपालांच्या मूर्ती कोरल्या आहेत.


पुराणकथा असे सांगतात की, या मंदिराची मूळ रचना पांडवांनी केली. तर सभामंडप जनमेजयाने बांधला व त्यानेच पांडवांच्या स्मृती प्रतिमांच्या रूपात सभामंडपात कोरल्या. पुढे शंकराचार्यानी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. लोकसमजुतीप्रमाणे माळव्याचा राजा त्रिभुवन नारायण यांनी इ.स. १०००-१०५० या काळात हे मंदिर बांधले इ.स. ११४३-७३ या कालखंडात कुमारपाल यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला. इ.स. १७६५-९५ दरम्यान साध्वी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करून मंदिरावर सुवर्णकळस चढविला. सध्याच्या मंदिराची उभारणी १८०३-१५ या कालखंडात झाली आहे. लाल रंगांच्या मजबूत दगडांनी बांधलेले हे मंदिर पाहताना या ३५८४ मीटर इतक्या उंचीवर, पूर्ण प्रतिकूल परिस्थितीत हे मंदिर बांधलेच कसे, हा पहिला प्रश्न पडतो.
पहाटे साधारण ५।।-६ वा. मंदिर उघडते. सकाळच्या पूजेला निर्वाण- दर्शन म्हणतात. यावेळी अभिषेक, प्रसाद केला जातो. शिवलिंगाला भाविक स्पर्श करू शकतात. यावेळी सोवळ्या-ओवळ्याचा प्रश्न येत नाही. पाण्याच्या अभिषेकाऐवजी शिवलिंगाला तूप लावण्याची येथे प्रथा आहे. साधारण दुपारी १ ते ४ वा. मंदिर बंद असते. दुपारच्या पूजेला शृंगार दर्शन म्हणतात. केदारनाथची शृंगारमूर्ती पंचमुखी आहे. आता कंठात सुवर्ण, हिरे माणकांचे दागिने, सुवासिक फुलांचे ब्रह्मकमळांचे हार घातले जातात. शिवसहस्त्रनाम, शिवमहिमा, रुद्राचे पठण होते. सारे वातावरण पावित्र्याने भारून जाते. यावेळी मात्र गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. रात्री साधारण ९।। वा. उत्तरपूजा होऊन मंदिर बंद होते.
या मंदिराच्या पुजाऱ्याला ‘रावळ’ अशी उपाधी टिहरीच्या राजघराण्याकडून प्राप्त झाली आहे. हे रावळ आपला मूळपुरुष शिवगण ‘भुकुंड’ होता असे मानतात. केदारनाथचे पौरोहित्य त्यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेले आहे. आजतागायत झालेल्या अशा तीनशे वीस पुजाऱ्यांच्या नोंदी देवस्थानाकडे उपलब्ध आहेत.
केदारनाथ मंदिराजवळच्या विस्तीर्ण पठारावर नवदुर्गाचे मंदिर आहे. मंदिरात दुर्गेच्या नऊ अप्रतिम मूर्ती होत्या. आज मात्र पाचच आहेत. कारण, चार मूर्ती चोरीला गेल्या.
मंदिरापासून साधारण १ कि.मी. अंतरावर एक प्रचंड शिळा आहे. तो आहे शिवगण ‘भैरव’. या भैरवनाथाला ‘बुढाकेदार’ असेही म्हणतात. हिवाळ्यात हा सर्व परिसर हिममय होतो, बर्फात झाकला जातो. त्या काळात या परिसराचे रक्षण व पावित्र्य राखण्याची जबाबदारी या भैरवनाथावर असते. तेथून पुढे एक गुंफा आहे. तिला भीमगुंफा म्हणतात. पुढे ६ कि.मी. अंतरावर ६८५६ मी. उंचीचे भृगुपंथ शिखर आहे. या शिखरातून स्वर्गद्वारा धार खाली येते. या शिखराकडे जाण्यासाठी जी पाऊलवाट आहे तिला स्वर्गरोहिणी वाट म्हणतात. या शिखराखाली अती खोल दरी आहे. तिला महापंथ म्हणतात. याच ठिकाणाहून धर्मराजाने सदेह स्वर्गात गमन केले, अशी आख्यायिका सांगतात. या शिखरावरून खाली दरीत पवित्र मनाने उडी घेतल्यास साक्षात इंद्र स्वागताला येतो व त्या मानवाला स्वर्गात घेऊन जातो अशी श्रद्धा आहे व केवळ या श्रद्धेपोटीच १२५०० पेक्षा जास्त लोकांनी इथून देहत्याग केला. ही हकीकत युरोपियन प्रवासी स्किनर याने आपल्या हिमालयातील प्रवास वर्णनात लिहून ठेवली आहे. हा देहत्याग म्हणजे एका मोठा समारंभ असे. १८८३ साली त्यावेळचे ब्रिटिश कमिशनर ट्रेल यांनी या स्वर्गरोहणाच्या पद्धतीवर बंदी घातली.
शंकराचार्य हे हिंदुधर्माचे मोठे आधारस्तंभ. केरळमधील कालडी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. वयाच्या ८व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला व आपले जन्मग्राम सोडले. सर्व भारतभ्रमण करून या दिव्य महापुरुषाने अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. हिंदुधर्माची पुन:प्रतिष्ठापना करून त्यानी हिंदु धर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली. हिमालयात त्यांनी अनेक मंदिरांची स्थापना केली. अनेक मंदिरांचा जीर्णोद्वार केला, मठ स्थापन केले व या स्थानांना अध्यात्मविद्येची शक्तिशाली केंद्रे बनवली. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांनी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केदारनाथला केली. केदारनाथ मंदिराजवळच त्यांचे समाधिस्थान आहे. मंदिराच्या पाठीमागे त्यांच्या दिग्विजयाचे स्मारक एका बळकट हाताच्या स्वरूपात साकारले आहे. हिरवळीवर उभ्या असलेल्या एका मोठय़ा भिंतीतून पुढे आलेला एका बळकट व आश्वासक हात, असे मोठं अर्थवाही हे स्मारक आहे. मंदाकिनीसोबत केदारनाथजवळच्या पर्वतशृंखलेतून आणखी चार नद्यांचा उगम होतो. कालभूषणमधून मधुगंगा, भृगुपंथमधून सरस्वती, तर सतोपंथमधून स्वर्गद्वारा व क्षीरगंगा! हसत, खिदळत नाचत या मंदाकिनीच्या गळ्यात पडतात व स्वत:ला हरवून बसतात. कौंचतीर्थ, ब्रह्मकुंड, हंसकुंड, अमृतकुंड, रेवसकुंड अशी अनेक कुंडे मंदिर परिसरात आहेत. मंदिरापासून २ कि.मी. अंतरावर चुरावाडी नावाचे निळ्या पाण्याचे एक सुरेख सरोवर आहे. म. गांधींच्या अस्थी या सरोवरात विसर्जित केल्या होत्या. आता या सरोवराला गांधी सरोवर असेही म्हणतात.
केदारनाथपासून ६ कि.मी. अंतरावर ‘वासुकी ताल’ नावाचे अतिशय सुंदर सरोवर आहे. या सरोवरातून सोनगंगा नदी उगम पावते. तिला वासुकीगंगा असेही म्हणतात. सोनप्रयागला ती मंदाकिनीला मिळते. कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी स्थानिक लोक या ठिकाणी जाऊन वासुकी तळ्याची पूजा करतात. वासुकी तालकडे जाणारा मार्ग मात्र खडतर आहे. अनुभवी मार्गदर्शकाची मदत घेणे येथे आवश्यक आहे. केदारनाथहून काही धाडसी यात्रेकरू, गिर्यारोहक वासुकी तालमार्गे बद्रीनाथला जातात. हे अंतर अवघे ३६ कि.मी. आहे. हा मार्ग अतिशय रमणीय असला तरी अत्यंत अवघड व बिकट आहे. मार्गात अनेक पर्वतशिखरे, ग्लेशिअर्स ओलांडावे लागतात.


या परिसराचे खरे सौंदर्य खुलते ते सरत्या पावसात, ऑगस्टच्या शेवटी सप्टेंबर महिन्यात! हिमालयात हा फुला-फळांचा मोसम! निळ्या आकाशाचा वेध घेणारी हिमाच्छादित शुभ्रधवल पर्वतशिखरे, त्यावर मध्येच रेंगाळणाऱ्या मेघमाला, पर्वतावर उठणाऱ्या प्रपातांच्या धवल रेषा. आसमंतात बहरलेली हिरवाई व त्यावर डोलणारी नाजूक फुले! पायात मध्ये-मध्ये येणारा एखादा निर्झर. थोडय़ा उंचीवर बहरणारी ब्रह्मकमळे, हिमकमळे! दिवसाच्या प्रत्येक क्षणी निसर्गाचे हे चित्र एक नवीनच मोहक रूप धारण करत असते. सूर्योदयाच्या-सूर्यास्ताच्या वेळी होणारी रंगांची उधळण व हिमशिखरांचे क्षणाक्षणाला बदलणारे रंग तर मन बहरून टाकतात, तृप्त करतात. सर्व परिसर एखाद्या सुस्नात लावण्यवतीसारखा मोहक दिसत असतो.
दिवाळी संपते. कार्तिकमास सुरू होतो. हवामान झपाटय़ाने बदलू लागते. गार वारे वाहू लागतात. आकाशाचा रंग बदलतो. मध्येच हलकासा पाऊस तर कधी भुरभुरणारा बर्फ! वातावरणात नीरव शांतता पसरते आणि एके दिवशी केदारनाथची स्वारी आपल्या शीतकालीन मुक्कामस्थानाकडे उरवीमठला प्रस्थान करते. केदारेश्वराचे भोगसिंहासन मंदिराबाहेर काढले जाते. मंदिराचे दरवाजे बंद होतात. सर्वजण केदारपुरीचा निरोप घेतात. आता इथे कोणीही थांबत नाही. सर्व परिसर निर्मनुष्य होतो. बर्फवृष्टी वाढू लागले. बघता बघता सर्व परिसर बर्फात दिसेनासा होतो.
चैत्र महिना उजाडतो. आकाश निळ्या रंगाने झळकू लागते. आसमंतात सोनशिंपण पसरते. सूर्यकिरणांचे नाजूक हात पर्वतशिखरे गोंजारू लागतात. बर्फाची चादर हलकेच दूर होऊ लागते. नव्या नवलाईचे दिवस सुरू होतात.

खुलणारा निसर्ग हसरा होऊ लागतो. सर्व परिसराला जाग येऊ लागते आणि एके शुभदिनी केदारनाथची स्वारी वाजत-गाजत समारंभपूर्वक आपल्या स्वस्थानी येते. मंदिराचे दरवाजे उघडतात. आपल्या स्थानावर केदारनाथ विराजमान होतात व आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहू लागतात. कारण भक्त हेच त्यांचे सर्वस्व आहे व भक्तांच्या भक्तीत आता त्यांना हरवून जायचे आहे.
महाद्रिपाश्वच तटे रमन्तं।
संपूज्यमानं सततं मनिंद्रे:।।
सुरासुरैर्यक्षमहोन गादय़ै:।
केदारमीशं शिवमेरुमीडे।।

No comments: